पंढरपूर – गत काही दिवसांपासून कार्तिकी एकादशीला (Kartiki ekadashi) विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता या चर्चेला मंदिर समितीने पूर्णविराम दिला आहे. मराठा समाजाचा (Maratha Samaj) रोष पाहून मंदिर समितीने कार्तिकी पूजेसाठी (Kartiki puja) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या यासंबंधीच्या भावना शासनाला कळवण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर दिली.
सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची (Kartiki Ekadashi) शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू दिली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने अखेर हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामुळे कार्तिकी एकादशीला नेमक्या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला बोलावयाचे यावर मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेले आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. पंढरपुरातही (Pandharpur temple) हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाचा कार्तिकी एकादशीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाचा मंत्र्यांना विरोध
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज सध्या आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही मंत्री, आमदार, खासदार यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. यंदा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा. मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.