मुंबई – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे.
काही ठिकाणी संततधार तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची भीती बळीराजाला आहे. ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस सुरु आहे.
अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात अडकला आहे. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची चिंता आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राधानगरी, भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील वातावरणातही लक्षणीय बदल झाला आहे.
जिल्हाभर ढगाळ वातावरण तर, काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पलूस भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असून जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला आहे. या अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका निर्माण झाला आहे.
गोव्यालाही अवकाळी पावसाने तडाखा
गोव्यालाही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. पहाटे पासून सुरू झालेल्या गडगडाटासह पावसाची रिपरिप आताही सुरूच आहे. गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार, दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच, आगामी तीन ते चार तासांमध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये गोव्यात गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. या काळात 40 ते 60 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.