-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
26 जुलै 2020 रोजी कारगिल युद्धाला 21 वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान म्हणून सर्व भारतीयांच्या कायम लक्षात राहील.
काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर, फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.
कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून 13 ते 18 हजार फूट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमिनीवर बर्फ साचलेला असतो. 26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी 26 जुलै रोजी “कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील 543 अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. 1 हजार 300 जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या जवानांचा वयोगट 19 ते 28 असा होता.
ऑपरेशन विजय – स्पेशल सर्व्हिसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दन लाइट इन्फट्रींच्या 11 बटालियन तुकड्या या युद्धात गुंतवल्या होत्या. भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता बटालियनपुरतीच कारवाई शक्य होती. टायगर हिल व तोलोलिंग येथला संग्राम भारतीय जवानांच्या पराक्रमाचा कळस होता.
डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात चार परमवीरचक्र, चार महावीरचक्र, 29 वीरचक्र आणि 52 सेना मेडल प्रदान करण्यात आले होते. कारगिल युद्धात अतिशय क्रूरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जिभेवर आहे. मे 1999 रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.
कॅप्टन विक्रम बत्रा
कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ 18 महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल.
त्यांच्या कंपनीला पॉइंट 5140 पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले; परंतु या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. 20 जून 1999 रोजी सकाळी 3.30 वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, “ये दिल मांगे मोर’. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. 8 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने एतिहासिक यश मिळवित 16 हजार फूट उंचीवर असलेले शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. बत्रा यांना मरणोपरांत परमवीरचक्र प्रदान करण्यात आले.
विजयंत थापर
राजपुताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डझन या 12 सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 12 जून 1999 च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ 15 मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खात्मा केला. 22 वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.
मनोज पांडे
खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅप्टन मनोज पांडे शहीद झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाइन अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. 23 जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन मिळविले. तिसऱ्या पोझिशनवर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूपक्षावर गोळीबार सुरू ठेवला.
कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते शहीद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, “ना छोडनू’. (नेपाळी भाषेचा मराठी अर्थ “त्यांना सोडू नका’) 24 वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीरचक्र प्रदान करण्यात आले.
सैनिक जास्त महत्त्वाचा – द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तिथे गेल्यानंतर ही शिखरे दिसतात आणि कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध सैनिकच जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.