आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
कराड – स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कराड नगरपरिषदेस महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दि. 4 जून रोजी दुपारी 4 वाजता मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई रविंद्रन, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांचीही उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे दरवर्षी राज्यात पर्यावरण संवर्धन करता बहुमूल्य दान देणाऱ्या औद्योगिक संस्था महानगरपालिका, नगरपालिका, सीईटीपी यांच्याकडून वसुंधरा पुरस्कारासाठी प्रवेश अर्ज मागवते. या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या पर्यावरण रक्षणासाठी दीर्घकालीन व आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक योगदान देणे संबंधित संस्थांनी अपेक्षित आहे.
मोठे उद्योग व मध्यम लघु किंवा सूक्ष्म उद्योग, महानगरपालिका व नगरपालिका तसेच सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (सीईटीपी) या तीन श्रेणीत प्रथम द्वितीय आणि तृतीय या श्रेणीत पुरस्कार प्रदान केले जातात. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व गुणवत्ता प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नगरपालिका गटात कराड नगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार 2019 जाहीर झाला असून तीन लाख रुपये रोख प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या पुरस्कारासाठी कराड नगरपालिकेचा प्रवेश अर्ज दिला होता. त्यानंतर 384 नगरपालिकांमधून महाराष्ट्रातील 5 नगरपालिकांचे अंतिम नामाकंन झाले होते. त्यानंतर कराड नगरपरिषदेसह नामांकन झालेल्या इतर नगरपरिषदांना सादरीकरणासाठी मुंबईला पाचारण करण्यात आले होते.
त्यानुसार मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मुंबईत कराड नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे सादरीकरण केले होते. त्याची दखल घेत शासनाने कराड नगरपरिषदेत प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार जाहीर केला आहे. पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत हा पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. हा पुरस्कार मिळालेले कराड नगरपरिषदेच्या पर्यावरण पूरक उपक्रमांची शासनाने दखल घेतल्याचे मानले जात आहे.
कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये सहभाग घेताना शहरात स्वच्छतेची चळवळ वृद्धिंगत केली. त्यामुळे गतवर्षी कराड नगरपरिषदेचा देशात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक आला. शहरातील घनकचऱ्याची उत्कृष्ट व्यवस्थापन, प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी, नदी स्वच्छता, शहरातील हरित क्षेत्राची वाढ, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण वायुप्रदूषण रोखण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्वांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने वसुंधरा पुरस्कारासाठी कराड नगरपरिषदेची निवड केली आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्र यादव, जेष्ठ नगरसेवक विनायकराव पावसकर, आरोग्य समिती सभापती गजेंद्र कांबळे, बांधकाम सभापती हणमंत पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्मिता हुलवान, नियोजन समिती सभापती विजय वाटेगावकर, पाणीपुरवठा समिती सभापती अर्चना ढेकळे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपालिकेचे विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी, कराडमधील सर्व सामाजिक संस्था, स्वच्छतादूत व कराडकर नागरिकांच्या सहकार्याने कराड नगरपरिषदेला हा पुरस्कार मिळाला आहे.
मंगळवारी 4 जून रोजी सायंकाळी 4 वाजता या पुरस्कारांचे वितरण मुंबईमध्ये होणार असून कराड नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कारही कराड नगरपालिकेने पटकावल्याने नागरिकांनी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.