कराड – कोयनासह जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण भरुन वाहू लागली असून कृष्णा-कोयना काठच्या गावांना महापूराचा चांगलाच फटका बसला असून परिस्थिती भयावह झाली आहे. शहरात शाहू चौक, दत्तचौकासह मुख्य बाजारपेठेत पूराचे पाणी घुसल्याने प्रशासनाचे वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणात येणारे सर्व पाणी बाहेर सोडण्याशिवाय धरण प्रशासनाकडे दूसरा पर्याय नाही. कोयना बरोबरच धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातील पाणीही कृष्णेतून कराड प्रितीसंगमावरच येत असल्याने साधारणपणे अडीच लाख क्युसेक्स पाणी कराडमध्ये येत आहे. हे प्रमाण हळूहळू वाढतच चालल्याने व धरण भागात पाऊस कमी न झाल्यास कराडकरांना 2005 पेक्षाही मोठ्या पूर संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. पाटण तिकाटणे कडून सह्याद्री हॉस्पिटलकडे येणारा रस्त्यावर पाणी आल्याने हा रोड पूर्णपणे बंद झाल्याने वाहतुक बंद झाली होती. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. मुसळधार पावसामुळे कराड शहरातील दैत्य निवारणी येथील भिंत पडली.
-तांबवे, रेठरे गावांना महापुराचा विळखा
-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर शुकशुकाट
-पुणे-कराड महामार्गावरील जड वाहतूक बंद
-कोयना-कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
-तांबवे येथील रहिवाशांनी सोडले गाव
-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराला पुराचे पाणी लागले
-एनडीआरएफची टीम दाखल
-वाठार येथील दक्षिण मांड नदीवरील पूल खचला
-महामार्गावरील वाहतूक ठप्प
-510 लोकांचे स्थलांतर