Kanhaiya Kumar । काँग्रेस नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार गेल्या काही वर्षांत देशाच्या राजकारणात लोकप्रिय चेहरा बनलाय. त्यांना ईशान्य दिल्लीतून तिकीट देण्यामागे काँग्रेसची दीर्घकालीन रणनीती आहे. पूर्वांचली वर्चस्व असलेल्या या जागेवर कन्हैयाला भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात उभे केले. काँग्रेसने या चालीतून पूर्वांचलींसमोर पूर्वांचली कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
कन्हैया कुमारला बिहारच्या बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण काँग्रेसला आघाडीत जागा मिळाली नाही. असं असलं तरी राजदला कन्हैया कुमार आवडत नाही असं मानलं जातं. मात्र मोदी सरकारविरोधात उघडपणे बोलण्यासाठी ओळखला जाणारा युवा नेता कन्हैया कुमारचा राहुल गांधींवर चांगलाच प्रभाव आहे.
कन्हैयाला मैदानात उतरवण्याची रणनीती काय? Kanhaiya Kumar ।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही इच्छा होती कि कन्हैया कुमारने निवडणूक लढवावी. अशा परिस्थितीत कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीच्या जागेचा पर्याय देण्यात आला होता. सध्या काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचा प्रभारी असलेल्या कन्हैयाला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यास दिल्लीत काँग्रेसला मोठा पूर्वांचली चेहरा मिळेल. निवडणुकीचा सूर सेट करताना कन्हैया कुमार मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करणार आहे, यामुळे काँग्रेसच्या प्रचाराला बळ मिळणार आहे.
या सगळ्यात आठ वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये लागलेल्या देशविरोधी घोषणा आणि चार वर्षांपूर्वी ईशान्य दिल्लीतील दंगल हा लोकसभा निवडणुकीत मुद्दा बनला, तर कन्हैया कुमारचा स्वतःचा प्रचार अडकू शकतो.
कोण आहेत कन्हैया कुमार? Kanhaiya Kumar ।
कन्हैया कुमार हा काँग्रेसचा नेता असून पक्षाने त्याला ईशान्य दिल्लीतून तिकीट दिलंय. कन्हैया कुमार जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्षही आहे. त्यांच्या वक्तृत्व आणि आक्रमक वृत्तीमुळे ते देशाच्या राजकारणात काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये कन्हैया कुमारने बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्याला भाजपच्या गिरिराज सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी कन्हैया कुमारने सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
2021 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या ते काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रभारीही आहेत. कन्हैया कुमार विरुद्ध देशद्रोहाचा खटला अजूनही न्यायालयात आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याने ते खूप चर्चेत होते.