वाई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र, त्यांचे विपुल लेखन, कविता यांचे नुसते वाचन करून उत्सव स्वरूपात त्यांची जयंती साजरी करणे योग्य नाही. जेव्हा सावरकरांचे विचार समाज अनुसरण करायला सुरुवात करेल, तीच खरी मानवंदना ठरेल, असे उद्गार अभय भंडारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना आज येथे काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, वाई यांच्यातर्फे वाईमध्ये आयोजित होणाऱ्या या व्याख्यानमालेचे यंदाचे हे तिसावे वर्ष आहे.
श्री. भंडारी यांनी आपल्या व्याख्यानातून सावरकर आणि आपण या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर सूर्यवंशी होते.
भंडारी पुढे म्हणाले, “आजच्या नवीन पिढीला सावरकर तितकेसे माहित नाहीत. त्या आधीच्या पिढीला त्यांची दोन- तीन गीते ठाऊक आहेत. त्यांची अफाट विचार मांडणी आणि त्यांचे आचरण जरी कठीण असले तरी अवघड नक्कीच नाही. मग ते राष्ट्रभक्तीचे आचरण असो, भ्रष्टाचार मुक्त जिणे असो, भाषाशुद्धी वापरणे असो किंवा आपापले काम सचोटीने करणे असो. आपण जर यापैकी काही आचरण करायचा प्रयत्न करू लागलो तरच आपण सावरकरांना खऱ्या अर्थाने सन्मान देऊ शकतो.’ व्याख्यानाचे अध्यक्ष सुधीर सूर्यवंशी म्हणाले, “सावरकरांवर ब्रिटिश राजवटीने अत्यंत अत्याचार केले. पण स्वातंत्र्यानंतरही समस्त सावरकर कुटुंबियांची अवहेलनाच झाली. अपमान झाले आणि होत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवं. त्यांचं तत्त्वज्ञान मुळातून समजावून घ्यायला हवं. यासाठी आता समाजानेच पुढे यायला हवं.’
बजरंग दलाचे सातारा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष हिंदुराव गोळे म्हणाले, “सावरकरांनी व्यक्त केलेली हिंदुत्वाची मांडणी अनेकांना आणि विरोधकांनाही अद्याप समजलेलीच नाही. त्यांनी खरंतर खरोखर राष्ट्रवाद मांडला. तो सर्वांनी अंगी अंगिकारायला हवा.’ श्री. गोळे यांच्या हस्ते अध्यक्ष आणि वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ने मजसी ने… हे गीत सादर केले. गौरव देशपांडे यांनी परिचय करून दिला. मनीषा घैसास यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील देशपांडे यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचा शेवट वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाला.