बडोदा: धर्मही नागरिकांसाठी आचारसंहिता असून धर्माशिवाय राजकारण अर्थहीन आहे, असे भारतयि जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले.
स्वामी नारायाण क्षेत्र येथे नड्डा भाविकांना मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, राजकारणात धर्माची सर्वाधिक गरज आहे, राजकारणाचा धर्माशी काय संबंध आहे? हा प्रश्न समाजात वेळोवेळी उपस्थित केला जातो. मला वाटते धर्माशिवाय राजकारण विवेकहीन आहे. त्याल काही अर्थ नाही. राजकारण हे नेहमी धर्माच्या आधारे चालते.
आमचा धर्माचा अर्थ आहे आचार संहिता. धर्माचा अर्थ आहे काय करायचे आणि काय करायचे नाही. त्यामुळे धर्माची सर्वात जास्त गरज असेल तर ती राजकारणात आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच या सकारात्मकतेने काम करत आहे, देशाला आणि समाजाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करत आहे.
नकारात्मकता पसरवत ज्या ज्या वेळ विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्या त्या वेळी पंतप्रधान अधिक सकारात्मकतेने आणि अधिक उर्जेने पुढे आले. त्यांनी प्रत्येकाला विकासाच्या दिशेने नेले. आयुष्यमान भारत, उज्ज्वल भारत योजना आदींचा तपशील देत त्यांनी मोदी सरकारने पार केलेल्या उद्दीष्टांची माहिती दिली.