मुंबई – बंडातात्या कराडकर यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करून केलेल्या टीकेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’पंकजा ताई असो किंवा सुप्रियाताई असो..एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही.”ते पुढे म्हणाले,’ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत” असं म्हणत त्यांनी बंडातात्या कराडकर यांचावर टीका केली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले मात्र यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारु पित असल्याचाही दावा केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत काही आक्षेपार्ह उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, राजकीय वातावरण तापल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.