सातारा – जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु असून महाबळेश्वर येथे विल्सन पॉईंटवरील बुरुज कोसळला. चतुरबेट येथील पूल पाण्याखाली गेल्याने त्या परिसरातील गावांचा संपर्क तुटला. कोयना धरणातील पाणीसाठा 40.63 टीएमसी झाला असून पाण्याचा धरणातील विसर्ग 49,325 क्युसेकपर्यंत वाढला आहे.
गेल्या 24 तासांत कोयना येथे 70 मिलिमीटर तर नवजा येथे 79 मिलिमीटर व महाबळेश्वर येथे 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जोरदार वारे व पावसाच्या सरी, दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. कराड येथे कोयना नदी जुना पूल पाण्याची पातळी धोकादायक रेषेजवळ पोहचली आहे. येथे पाणी पातळी 556.248 मीटर इतकी आहे. सातारा, वाई, महाबळेश्वर व जावळी तालुक्यात गेल्या 24 तासांत पावसाने चांगलाच जोर पकडला आहे.
महाबळेश्वर येथील विल्सन पॉईंटवरील एक जुना बुरुज जमीनदोस्त झाला आहे. चतुरबेट परिसराला जोडणारा पूल पाण्यात गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. कराड व पाटण तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रात येणाऱ्या गावांची पाहणी महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत असून या आपत्कालीन परिस्थितीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह लक्ष ठेवून आहेत. स्थलांतरित 131 कुटुंबाना योग्य मदत दिली जात आहे. कराडच्या कृष्णा व कोयनेच्या क्षेत्रात एनडीआरएफचे पथक तळ देऊन आहे. सातारा शहरातही पावसाचा जोर असून गेल्या 24 तासांत 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यातील रस्त्यांची मुसळधार पावसाने दैना उडाली आहे. शहरात जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे सर्वत्र राडारोडा निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. कास धरण परिसरातही पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळी 39 फुटावर पोहचली आहे. बुधवारी सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पश्चिम भागातील घाट रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच भात लागणीची कामेही यद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र आहे. पूर्व भागातही पेरणीच्या कामांना गती आली आहे.