केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टीका ठरली कारणीभूत
पाटणा: बिहारला पावसाने तडाखा दिल्यानंतर त्या राज्याची राजधानी असणारे पाटणा शहर आठवडाभर जलमय बनले. त्यावरून त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजप आणि जेडीयू या मित्रपक्षांमध्येच जुंपली.
मित्रपक्षांमधील शाब्दिक युद्धाला केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांची टीका कारणीभूत ठरली. त्यांनी पाटणा जलमय बनल्याची स्थिती अयोग्यरित्या हाताळल्यावरून बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. नितीश यांना लक्ष्य करतानाच त्यांनी उपमुख्यमंत्रिपद सांभाळणारे स्वपक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनाही सोडले नाही. प्रशंसेसाठी नेते पात्र असतील; तर टीकेचे धनीही त्यांना करायला हवे. सत्तारूढ एनडीएने पाटण्यातील जनतेची माफी मागायला हवी, असे त्यांनी म्हटले.
मात्र, गिरीराज यांनी केलेली टीका जेडीयूला रूचली नाही. त्या पक्षाच्या विविध नेत्यांनी गिरीराज यांच्यावर पलटवार करतानाच भाजपवरही निशाणा साधला. नितीश यांच्या पायाला लागलेल्या धुळीच्या कणाशीही गिरीराज यांची तुलना होऊ शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जेडीयूचे प्रवक्ते संजय सिंह यांनी दिली. तर पाटण्यातील स्थितीसाठी अधिक दोष भाजपलाच द्यायला हवा, असे त्या पक्षाचे आणखी एक प्रवक्ते राजीवरंजन प्रसाद यांनी म्हटले.
राज्याचे नगरविकास खाते आणि पाटण्याचे महापौरपद भाजपकडे आहे. पाटण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे, याकडे प्रसाद यांनी लक्ष वेधले. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.त्यागी यांनी विरोधकांपेक्षाही गिरीराज सत्तारूढ एनडीएला अधिक नुकसान पोहचवत आहेत, असा आरोप केला. तर गिरीराज यांची भूमिका योग्य असल्याचे म्हणत विरोधी पक्षांनी सत्तारूढ एनडीएमधील धुसफुसीला आणखी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला.