तब्बल 72 हजार 169 मताधिक्याने विजय
इस्लामपूर – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातव्यांदा निर्विवाद वर्चस्व राखले. तब्बल 72 हजार 169 इतक्या मताधिक्याने त्यांनी विजयी मिळवला. भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष निशिकांत पाटील व महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी अशा तिरंगी लढतीत निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
येथील शासकीय गोदामात 15 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. निवडणूक आयोगाचे निरीक्षक प्रवीणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण वीस टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी नागेश पाटील उपस्थित होते. सुरवातीला पोस्टल मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून जयंत पाटील यांनी मताधिक्य कायम ठेवले. पहिल्या फेरीत तीन हजार 357 मताधिक्य मिळवले. ते अखेरपर्यंत वाढतच राहिले. पाचव्या फेरीत 23 हजार 578, सातव्या फेरीत जयंत पाटील यांना अवघे 1401 इतके मताधिक्य मिळाले. या फेरीत वाळवा गावांसह परिसरातील गावे होती. या फेरीत शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी पाच हजार 820 इतकी मते मिळवली.
तर जयंत पाटील यांनी सात हजार 221 मते मिळवली. दहाव्या फेरीत हेच मताधिक्य 47 हजार 924 इतके होते. शेवटच्या फेरीत जयंत पाटील यांनी 72 हजार 169 इतके मताधिक्य मिळवल्याचे घोषित झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. इस्लामपूर शहरातील उमेदवार नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना मताधिक्य मिळेल, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास होता. पण शहरातील बूथची मतमोजणी झाल्यावर मताधिक्य न मिळाल्याने नगराध्यक्षांच्या समर्थकांनी मतमोजणी आवार सोडले. इस्लामपूर शहराने जयंत पाटील यांना 11 हजार 144 इतके मताधिक्य दिले.
येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झेंडे, जयंत पाटील यांची छायाचित्रे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तालुक्यातील तरुणांनी इस्लामपूर शहरात धाव घेतली. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून तरुण कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, बालेकिल्ल्यातच जयंत पाटील यांना गारद करण्याचे भाजपचे मनसुबे येथील मतदारांनी उधळून लावले.
इस्लामपूर व आष्ट्यातून 17 हजारांचे मताधिक्य
इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांना 11 हजार 144 इतके मताधिक्य मिळाले. येथे तीन बूथवर जयंत पाटील यांना निशिकांत पाटील यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले. तर आष्टा शहरात जयंत पाटील यांना सहा हजार 110 इतके मताधिक्य मिळाले. येथे फक्त एका बुथवर शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी आघाडी घेतली. तालुक्यातील फक्त चार बुथवर जयंत पाटील पिछाडीवर राहिले.
टपाली मतदानातही आघाडी
आष्टा येथील बूथ क्रमांक 165 मशीन खराब झाल्याने तेथील व्हीव्हीएम चिठ्या मोजण्यात आल्या. यात एकूण 801 मते होती. अनुक्रमे जयंत पाटील, निशिकांत पाटील व गौरव नायकवडी यांना 426, 156, 90 अशी मते मिळाली. त्यात पाटील यांनी 270 चे मताधिक्य मिळवले. टपाली मतदान अनुक्रमे जयंत पाटील, निशिकांत पाटील व गौरव नायकवडी यांना अनुक्रमे 1066, 214,244 अशी मते मिळाली. इथे जयंत पाटील यांनी 822 मताधिक्य मिळवले.