सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी-20 मालिका सुरु आहे आणि नंतर ऑस्ट्रेलियातच भारत चार कसोटींची मालिका खेळणार आहे. क्रिकेटचे मर्यादित षटकांचे (आधी 50; आता 20 अर्थात टी-20) कितीही लघुप्रकार निर्माण झाले, तरी कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट असे मानणारी पिढी आजही आहेच.
जसं संगीताचे कितीही प्रकार निर्माण झाले, तरी शास्त्रीय संगीताचे महत्त्व कधीच कमी होत नाही, तसेच कसोटी क्रिकेटचे आहे. मागील 85 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय संघासह विविध भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम केले; आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत संस्थाही ठरली.
वर्ष 1932 मध्ये भारताने आपला पहिला-वहिला कसोटी सामना खेळला होता इंग्लंडमध्ये. भारताचे कर्णधार होते कर्नल सी. के. नायडू आणि केवळ एकाच सामन्यासाठी भारत इंग्लंडला गेला होता. सामना होता “क्रिकेटची पंढरी’ समजल्या जात असलेल्या लॉर्डस मैदानावर.
या सामन्यात भारताचे सलामीवीर होते नऊनाल जेऊमाल आणि त्यांच्यासमवेत एका पुणेकर फलंदाजाने भारतासाठी पहिला-वहिला कसोटीमधला चेंडू खेळला, ते फलंदाज होते जनार्दन ज्ञानोबा नवले यांनी. इंग्लंडचे गोलंदाज होते बिल बोवेज. पुण्याच्या फुलगावचे नवले हे अशा प्रकारे भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासाच्या नोंदले गेलेले मराठी नाव ठरले.
नवले यांनी या सामन्यात पहिल्या डावात 12 आणि दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. शिवाय भारत या कसोटीत 158 धावांनी पराभूत झाला. मात्र, असे असले तरी, नवले यांच्या कामगिरीचे महत्त्व जराही कमी होत नाही. भारतीय कसोटी क्रिकेटच्या पायाभरणीचा हा वाटेकरी पुढेही फार क्रिकेट खेळला नाही. पण भारतातर्फे पहिला कसोटी चेंडू खेळणारा फलंदाज म्हणून त्यांची ऐतिहासिक नोंद कोणालाही पुसता येणार नाही.
नवले यांना भारतातर्फे दोन कसोटी खेळता आल्या. त्या चार डावांत मिळून त्यांनी 42 धावा केल्या. त्यामध्ये 13 सर्वोच्च धावा होत्या. या दोन्ही सामन्यांत त्यांनी यष्टीरक्षण करताना एक झेलही घेतला होता. “विस्डेन’ने त्यांच्या यष्टीरक्षणाचे कौतुक करताना, ते चपळ यष्टीरक्षक असल्याचे म्हटले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवले यांनी 65 सामन्यांत 107 डावांत 4 वेळा नाबाद रहात, 19.18 च्या सरासरीने 1976 धावा केल्या. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या 96 होती. तसेच यष्टीमागे त्यांनी 101 झेल आणि 36 यष्टीचित (स्टम्पिंग) करत 137 विकेट्स घेतल्या होत्या. ते ग्वाल्हेर, मध्य भारत, राजपुताना, होळकर, हिंदूज अशा विविध संघांकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते.
डिसेंबर 7, 1902 ला जन्मलेले नवले 77 वर्षे जगले आणि 7 सप्टेंबर 1979 रोजी त्यांचे पुणे येथेच निधन झाले.
नवले यांच्या काळात आजच्या इतका पैसा क्रिकेटमध्ये नव्हता आणि मर्यादित षटकांचे किंवा टी-20 सारखे क्लब क्रिकेटही नव्हते. त्यामुळे त्या काळात क्रिकेटपटू नोकरी करुन कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करत असत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर संसार चालवण्यासाठी त्यांनी एका साखर कारखान्यात सिक्युरिटी गार्डचे काम केले होते. सत्तरच्या दशकानंतर ते अनेकांच्या विस्मरणात गेले होते. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांचे खास स्मरण.