कोल्हापूर (प्रतिनिधी)- आई-वडिलांचा सांभाळ दैवत मानून करा. प्रामाणिकपणाने त्यांची सेवा करा, त्यांना कधीही अंतर देऊ नका, असे भावनिक आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेश देण्याच्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शासकीय विश्रामगृह परिसरातील राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, घरातील नोकरीत असलेला कर्ता पुरुष किंवा महिलेच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळत असते. त्यामुळे नियुक्ती झाल्यानंतर आई-वडिलांना गावात टाकून शहरात राहू नका. कामाच्या सोईसाठी राहायचेच असेल तर आई-वडिलांना सोबत घेऊन रहा. मोह आणि लोभापासून बाजूला रहा, प्रामाणिकपणे सेवेत कार्यरत रहावे, असेही ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, मनुष्यबळाच्या अभावी कार्यालयीन कामकाजावर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे मृत नोकरदारांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावरील नोकरी तातडीने मिळेल यासाठी योग्य तो बदल करण्याची कार्यवाही करू.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, यापूर्वी दहा टक्के निकषाप्रमाणे अनुकंपा वरील नियुक्त्या व्हायच्या. परंतु, फेब्रुवारीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वीस टक्के प्रमाणे नियुक्त्या करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ही कार्यवाही होत आहे. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे हे पुण्याईचं काम करण्याचा योग आला आहे. नोकरी करणाऱ्या कर्ता पुरुष किंवा स्त्रीच्या जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबातील वारसदाराला तातडीने अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी आपण व मंत्री मुश्रीफ सामान्य प्रशासनाशी बोलून योग्य ती कार्यवाही करू, असेही मंत्री पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती सौ. स्वाती सासणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल आदी प्रमुख उपस्थित होते.
त्या आईची काळजी घ्या ………
पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, अनुकंपाची ही नोकरी म्हणजे आईच कुंकू पुसल्यामुळे मिळालेली नोकरी आहे, याचे भान ठेवा. त्यामुळे नोकरी मिळाल्यानंतर त्या आईची परवड होऊ देऊ नका. आईची जीवापाड काळजी घ्या, असेही मंत्री पाटील म्हणाले.