मुंबई – राज्यात आज करोनाबाधितांच्या संख्येने ५००चा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकांना संयमाचे आवाहन करत समाजात दुही माजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारच, अशा शब्दांत इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, करोनापासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. जगभर धुमाकूळ या व्हायरसने घातला आहे. या केसेसमध्ये आपण रुग्ण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. काळजी करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे हेदेखील लक्षात घ्या, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.
दरम्यान, मरकजवरून राज्यात आलेल्या सर्वांचा शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात असून त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.