नवी दिल्ली – अंतराळ क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याची नेहरूंची दृष्टी होती आणि भारताच्या अगदी सुरूवातीच्या काळात अनेक समस्या असताना अंतरीक्ष संशोधनावर खर्च करण्यावर टीका केली गेली होती परंतु टीकेला न जुमानता, जगाच्या दबावाला न जुमानता नेहरूंनी पावले टाकली. त्यामुळे आता अवकाशात भारताला इतका समृद्ध लाभ मिळाला आहे असा दावा कॉंग्रेसने केला आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज या संबंधात म्हटले आहे की, इस्रोच्या उल्लेखनीय कामगिरीवर पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये भरपूर भाष्य केले जात आहे, त्यांनी अशी खंत व्यक्त केली आहे की, सुपरको ही पाकिस्तानची अंतराळ संस्था भारताच्या अंतरीक्ष संशोधन संस्थेच्या काही महिने आधीच म्हणजे 1961 च्या उत्तरार्धात स्थापन झाली होती तरीही त्यानंतर स्थापन केल्या गेलेल्या भारतीय संस्थेने एवढी मोठी प्रगती केली आहे.
भारताने मिळवलेल्या यशाची सध्या सर्वत्र चर्चा केली जात असली तरी नेहरूंनी या क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर पहिल्यापासून जो जोर दिला होता त्याची आज कोणीही आठवण काढत नाही अशी खंतही जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की प्रथम नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी यांनी हे स्पष्ट केले होते की अंतराळ कार्यक्रमाची रचना, नियंत्रण भारतीय वैज्ञानिकांनीच केले पाहिजे. यामध्ये त्यांना अर्थातच होमी भाभा, विक्रम साराभाई, सतीश धवन, पी एन हक्सर आणि इतर अनेकांचे मार्गदर्शन आणि मदत मिळाली.
अंतरीक्ष संशोधन क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया तसेच विस्तीर्ण पायाभूत सुविधा नेहरूयुगीन काळात तयार केल्या गेल्या, भारत हा अत्यंत गरीब देश असल्याने अशा प्रकारची अंतरीक्ष संशोधनाची गरज नाही अशी टीका त्यावेळी नेहरूंवर केली जात होती. परंतु तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून हा अंतरीक्ष संशोधनाचा कार्यक्रम अत्यंत नेटाने चालू ठेवला त्याचेच आज हे यश मिळाले आहे असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.