बीड – मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र, तो सरकारने पाळला नाही. माझ्यावर, सामान्य मराठा बांधवांवर एसआयटी नेमून आंदोलन दडपण्याचा डाव आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी सगेसोयरे अध्यादेशचा काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे न केल्यास आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ, असे प्रतिपादन मराठा अंदोलक मनोज जरांगे यांनी केले.
जरांगे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेश जारी केला जात नाही. तोवर मी तुम्हाला सोडणार नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिंमत लागते. माझ्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे.
तुम्ही 4 वेळा समाजाला फसवले मागच्या 6 महिन्यापासून आम्ही आपल्याला विनवण्या करत आहोत अन् तुम्ही आमचे ऐकत नाहीत म्हणल्यावर आम्ही थोड बोलणारच. मग आपल्याला राग नाही आला पाहिजे. मला राजकारण्यांचे देणे घेणे नसून फक्त आरक्षण हवे आहे. फडणवीस साहेब तुमच्यासोबत आमचे शत्रूत्व नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
राजकीय पुढाऱ्यांनी मराठा बांधवांच्या दारात येऊ नये, अन्यथा तुम्हाला रोषाचा सामना करावा लागेल. तर कुणबी मराठा, सगेसोयरे व हैदराबाद गॅझेटला मान्यता देऊन ओबीसीतूनच आरक्षण द्यावे हीच आमची आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे असे, जरांगे म्हणाले.