चंदीगड – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विषयावरून काल जे बाण सोडले होते त्यावरून भारतीय जनता पार्टीच्या पंजाब शाखेने केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. केजरीवाल यांनी पंजाबींचा अपमान केला असून निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल असे भाजपचे नेते सुनील जाखड यांनी म्हटले आहे.
जाखड म्हणाले, पंजाब आणि पंजाबींना फसवले जाते आहे. तीन देशांतून शरणार्थी भारतात आले तर ते लूट करतील असे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. ते स्वत:ला गरिबांचा मसिहा म्हणवतात.
मात्र त्यांनी हे विसरू नये की दिल्लीच्या विकासात पंजाबी शरणार्थ्यांचे मोठे योगदान आहे. शीखांच्या व्यतिरिक्त जे अन्य शरणार्थी दिल्लीत आले त्यांनीही विकासात मोठे योगदान दिले आहे.
आम्हाला तर गुरू ग्रंथसाहिबही तेथून परत आणायचे आहे. मात्र केजरीवाल म्हणत आहेत की हे लोक भारतात आल्यावर लूट करतील. असे बोलून त्यांनी पंजाब आणि पंजाबींचा अपमान केला आहे व जनता त्यांना धडा शिकवेल.
काय म्हणाले होते केजरीवाल
सीएए लागू केला तर देश असुरक्षित होईल. अराजकाची स्थिती निर्माण होईल. अन्य देशांतून येणाऱ्या अल्पसंख्यकांसाठी भारतातील करदात्यांचा पैसा खर्च करणे आम्हाला मान्य नाही. सीएएद्वारे शेजारी देशांतील अल्पसंख्यकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. त्या देशांमध्ये २.५ कोटींपेक्षा अधिक अल्पसंख्यक आहेत.
भारताचे नागरिकत्व मिळणे म्हणजे त्यांचे स्वप्न सत्यात येण्यासारखे असेल. या लोकांपैकी निम्मे लोक जरी भारतात आले तर त्यांना आम्ही ठेवणार कुठे? अगोदर घुसखोर आपल्या देशाच्या सीमा ओलांडताना घाबरत होते.
आता तर ते राजरोस भारतात प्रवेश करतील. केजरीवाल यांच्या याच विधानांना आता भाजपकडून राजकीय रंग दिला जात असून त्यांच्या विरोधात अत्यंत कटू शब्दांचा वापर करत त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.