Pune Crime : विमानतळ परिसरातील मॉलच्या आवारातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या तरुणीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीचा मृतदेह अहमदनगर जिल्हयातील कामरगावाच्या हद्दीतील एका खड्डयामध्ये पुरण्यात आला होता. हा मृतदेह रविवारी रात्री पोलिसांनी शोधून काढला. यानंतर तीच्या महाविद्यालयातील दोन तरुणांसह तीघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात तीचा खून खंडणीसाठी झाल्याचे दिसत असले तरी पोलीस इतरही शक्यता पडताळून पहात आहेत.
भाग्यश्री सुर्यकांत सुडे (२२ , सध्या रा. विमाननगर, मुळ लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर तीच्या खुून प्रकरणी शिवम फुलवळे(२१, रा. वाघोली), सुरेश शिवाजी इंदोरे (२३ रा. मुखेड जि. नांदेड) आणि सागर रमेश जाधव ( २३ , रा. ता. शिरोळा, जि. लातुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भाग्यश्री आणि शिवम एकाच महाविद्यालयात संगणक पदवीचे शिक्षण घेतात. तसेच दोघेही लातूरचेच असल्याने त्यांची ओळख होती. शिवमने ३० मार्चला भाग्यश्रीला एका वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगत मॉलमधून खाली बोलावून घेतले. त्याने तीला कारमध्ये बसवले तेव्हा कारमध्ये अगोदरच शिवमचे मित्र सुरेश आणि सागर बसले होते.
दरम्यान कार वाघोलीच्या दिशेने जात असताना तीला संशय आला. यामुळे तीने विरोध केल्याने तीचे तोंड दाबून तीचा खून करण्यात आला. यानंतर तीचा मृतदेह पुणे नगर महमार्गावर असणाऱ्या कामरगाव गावचे हद्दीमध्ये मोकळ्या जागेतील खड्डयामध्ये टाकला. त्यावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आला. यानंतर आरोपी नगर, औरंगाबाद, नांदेड, मुंबई आणि नवी मुंबई असे फिरत राहिले.
पोलिसांना आणि पालकांना भाग्यश्री जीवंत असल्याचे भासवले
आरोपींनी भाग्यश्रीचा मोबाईल मात्र स्वत: जवळ ठेवला. त्यांनी तीच्याच मोबाईलवरुन तीच्या वडीलांना मुलीचे अपहरण केले असुन ती सुरक्षित पाहिजे असल्यास ९ लाख रुपये तीच्या बँक खात्यात जमा करा असा मेसेज दुसऱ्या दिवशी पाठवला. वडिलांनी तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी मेसेजचे तांत्रिक विश्लेषणात केले मेसेज हा जोगेश्वरी परिसरातुन आल्याचे समजले तेथे शोधाशोध करुनही हाती काहीच आले नाही.
दरम्यान मुलींचे बँक खात्याची व मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी शिवमचा सहभाग निष्पन्न झाला. शिवमला वाघोली येथुन ताब्यात घेण्यात आले. त्याने साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबुल केले. मात्र तोवर सात दिवस आरोपी मुलीच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवून ती जीवंत असल्याचे भासवत होते. पोलिसांनाही ती जीवंत असल्याची आशा होती.
एक दिवस अगोदरच खड्डा खोदून आले
आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण करण्याआधी एक दिवस अगोदरच खड्डा खोदून ठेवला होता. अपहरण आणि खड्डा खोदण्यासाठी त्यांनी ॲपवरुन कार भाड्याने घेतली होती. दोन्ही वेळेस कार कामरगाव गावाच्या हद्दीत थांबल्याचे कारच्या जीपीएस विश्लेषणातून दिसले. यामुळे पोलिसांनी आरोपीला घेऊन तेथे धाव घेतली असता, त्यांना भायश्रीचा मृतदेह आढळला.
ही कारवाई अपर पोलीस मनोज पाटील, उप आयुक्त विजयकुमार मगर, सहा आयुक्त आरती बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरिक्षक विजय चंदन, उप निरिक्षक चेतन भोसले, पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, सचिन जाधव, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश तोडेकर, उमेश धेंडे, रिहान पठाण, ज्ञानेश्वर आवारी, किरण खुडे यांनी केली आहे.