पवनानगर -तारेच्या कुंपनात अडकलेल्या आणि काचेमुळे चारही पायांना जखम झालेल्या बिबट्याची वन विभागाने सोमवारी (दि. 16) सुटका केली. पवन मावळातील पानसोली गावात हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
पानसोली या गावात बिबट्या दिसल्याची माहिती दीपाली आनंद ठोंबरे या महिलेने फोनद्वारे वन विभागाला दिली. घटनचेची माहिती मिळताच वन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तारेच्या कुंपणात अडकलेल्या आणि काचेमुळे चारही पायांना जखम झालेल्या बिबट्याची वन विभागाने सुटका केली. एक वर्षाचा हा बिबट्या असून त्यास पुढील उपचारासाठी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव येथे पाठवण्यात आले आहे.
वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी हनुमत जाधव, वनपाल दीपाली डोमे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक राहुल पाटील, मावळचे सहायक वसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान 13 जानेवारी 2023 रोजी पाले गावाच्या हद्दीत डोंगर पठारावर दुपारी चार वाजताच्या सुमारास बिबट्याने लक्ष्मण जानकू पाटील यांच्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी 7 जानेवारी रोजी कान्हे एमआयडीसीतील महेंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्या दिसून आला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी पानसोली गावात जेरबंद करण्यात आलेला बिबट्या हा पाले गावात दिसून आलेला बिबट्या नसल्याचे वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी सांगितले. पाले गावापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर पानसोली गाव आहे. त्या बिबट्याला पकडण्यासाठीही वन विभागाने सापळा लावला असल्याचे
त्यांनी सांगितले.