पिंपरी – गेल्या एक आठवड्यापासून पवना नदीच्या प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त होत असतानाच पवनेपाठोपाठ इंद्रायणी नदीही फेसाळली आहे. किमान चार ते पाच फूट उंच आणि एक किलोमीटर लांब फेसाने इंद्रायणीचे पात्र व्यापले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत इंद्रायणी नदीची ही अवस्था पाहून भाविक आणि स्थानिक नागरिक व्यथित झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रसायननदीपात्रात सोडले जात असल्याने होणाऱ्या जलप्रदुषणामुळे इंद्रायणीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. रात्री-अपरात्री महापालिकेच्या हद्दीतून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्र वारंवार फेसाळत आहे. शनिावरी (दि.11) सकाळी) हा प्रकार निदर्शनास आल्याने आळंदीकर ग्रामस्थ व भाविकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आळंदी येथील इंद्रायणीनदीवरील बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर फेस साचला आहे. या फेसाची उंची किमान पाच ते सहा फूट इतकी आहे.
मुख्यमंत्र्याचे आश्वासन हवेत विरले
काही दिवसांपूर्वी आळंदीतील स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, संत ज्ञानेश्वर महाराज व भावंडांच्या वास्तव्याने पावन झालेले सिद्धबेट व इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबतची स्थिती त्यांच्या कानावर घातली होती. त्यावर नक्की तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, दर दोन-चार दिवसांनी प्रदुषित होणारी इंद्रायणी पाहण्याचे वेळ आळंदीकर व भाविकांवर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिलेले आश्वासन हवेत विरल्याचे स्पष्ट झाले.
श्री क्षेत्र आळंदी हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दररोज हजारो भाविक माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी येत असतात. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. माऊली मंदिराजवळून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीलादेखील महत्वाचे स्थान आहे. मात्र दिवसेंदिवस या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. रात्री अंधार पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
तीर्थ प्राशनाकडे भाविकांची पाठ
आळंदीची वारी करताना माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन, नगरप्रदक्षिणा व इंद्रायणीनदीचे तीर्थप्राशन महत्वाचे मानले जाते. मात्र, नदीचे प्रदूषण पाहता आता वारकऱ्यांकडून तीर्थप्राशन केले जात नाही. काही दिवसांपूर्वी आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणीनदी घाटावर नदीचे पाण प्पिण्यालायक नसल्याचा फलक लावण्यात आला होता.
प्रदूषण मंडळाविरोधात तीव्र रोष
सध्या दिवाळीच्या सुट्टया असून, आळंदी भाविकांच्या गर्दीने गजबजली आहे. याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या भाविकांबरोबरच कामगार व नागरिक काहीवेळ थांबून दु:खी मनाने इंद्रायणी नदीची दुर्दशा पाहत आहेत. अनेक भजने आणि भक्तीगीतांमध्ये स्थान मिळविणाऱ्या इंद्रायणी नदीच्या या दुर्देशेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, नदीची दुरवस्था होत आहे.