कोपरगाव -ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपले पाहिजे. विरोधाला विरोध करून काम करणे ही आमची पद्धत नाही. यापूर्वीदेखील संस्था हित बघून श्री गणेश कारखाना निवडणुकीत तुम्ही हाक दिली त्याला आम्ही प्रतिसाद दिला, तसेच आगामी काळातही ज्या-ज्या निवडणुका येतील त्यात खंबीरपणे तुमच्या सोबत उभे राहू, असे आश्वासन कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिले.
राहाता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गणेश कारखाना उपाध्यक्ष विजय दंडवते, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, धनंजय जाधव, रामचंद्र बोठे, भाऊसाहेब चौधरी, सर्जेराव जाधव, ऍड.नाईक भाऊसाहेब, विक्रम वाघ, संजय शेळके, भाऊसाहेब थेटे, विजय फोफसे, संजय सरोदे, डॉ. जेजूरकर, उत्तम मते, धनंजय गाडेकर, डॉ. वसंतराव लभडे, विलास टिळेकर, दादाभाऊ सांभारे, राजेंद्र बाभूळके, बाळासाहेब वाघ, राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, सहकार हितासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणेश कारखाना निवडणूक लढलो आणि आता कारखाना सुरू झाला. अनेक अडचणी त्यात आल्या मात्र मार्ग निघाला. येत्या काळात पाणीप्रश्न भेडसावणार असून, न्यायालयीन लढाई कोल्हे कारखाना लढतो आहे. मात्र, जर न्याय मिळाला नाही तर आपल्याला रस्त्यावरची लढाईदेखील लढावी लागेल यासाठी उपस्थितांनी हात उंचावून होकाराचा एल्गार केला. पुणतांबा, वाकडी, चितळी या मोठ्या ग्रामपंचायती जिंकून जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. जे सदस्य विजयी झाले त्यासह जे कोणत्याही दबावाला बळी न पडता लढले ही खरी ताकद आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी शेती महामंडळाच्या जमिनी पाणीपुरवठा योजनेला मिळाव्या यासाठी पुणतांबा-रस्तापूरचा प्रश्न विधानसभेत लावून धरला होता त्यामुळे संपूर्ण राज्यात निर्णय होऊन अनेक पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या, असे त्यांनी सांगितले.