भारतीय बनावटीच्या “तेजस’ लढाऊ विमानाला मलेशियाने नुकतीच सर्वोच्च पसंती दिली आहे. हा करार पूर्णत्वास गेल्यास संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार बनण्याच्या प्रवासातील तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
आग्नेय आशियाई देश असणारा मलेशिया सध्या जुनी लढाऊ विमाने बदलण्याचा विचार करत आहे. यासाठी विविध देशांकडून अत्याधुनिक विमानांविषयीचे प्रस्ताव मलेशियाने मागवले होते. यामध्ये भारताच्या “तेजस’ विमानाने चिनी विमान जेएफ-17, दक्षिण कोरियाचे विमान एफए-50 आणि रशियाचे मिग-35 तसेच याक-130 या विमानांशी कडवी प्रतिस्पर्धा करत आपले महत्त्व जगात सिद्ध केले आहे. उभय देश खरेदी प्रक्रिया पुढे करण्याबाबत चर्चा करत आहेत. भारत खरेदी पॅकेज अंतर्गत मलेशियात एमआरओ (देखभाल, दुरुस्ती, एकूण देखरेख) देण्याची सुविधा देण्यास तयार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. परिणामी, मलेशियाला रशियाच्या एसयू-30 विमानाचे सुटे भाग खरेदी करताना अडचणी येत आहेत. हीच संधी साधून भारत मलेशियाला लढाऊ विमानाची निर्यात करण्यावर भर देत आहे. हा व्यवहार तडीस गेला तर जगभरात अन्य खरेदीदारांसाठी चांगला संकेत जाऊ शकतो आणि त्यामुळे भारताच्या संरक्षण सामग्री विक्रीच्या मोहिमेला प्रोत्साहन मिळेल.
सर्वांत मोठा फायदा असा की, संरक्षण उत्पादनाला पोषक वातावरण देशात निर्माण होईल. अशा वातावरणाची आज खूपच गरज आहे. डिझाइन आणि अन्य तांत्रिक बाबींमध्ये भारतीय तंत्रज्ञ आघाडीवर आहेत. ज्यावेळी कार आणि स्कूटरचेही डिझाईन भारतात केले जात नव्हते, तेव्हा भारतात लढाऊ विमानाचे डिझाईन तयार करण्यात आले होते; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्बंधांसमवेत अनेक गोष्टींमुळे आपली या क्षेत्रात पीछेहाट झाली. आज गरज आहे ती केवळ राजकीय इच्छाशक्ती, प्रोत्साहन आणि गुंतवणूक वाढविण्याची. तसेच संशोधनावरील खर्चही वाढणे अपेक्षित आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून तयार होणारे “तेजस’ हे एकल इंजिन असणारे आणि अत्याधुनिक सक्षम, बहुपयोगी सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. हे विमान उच्च जोखमीच्या वातावरणातही दमदार कामगिरी करते. भारतीय संरक्षण ताफ्यात “तेजस’ दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी 83 तेजस लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी “एचएएल’बरोबर 48 हजार कोटी रुपयांचा करार केला. “तेजस’च्या यशाने प्रेरित होऊन भारताने पाचव्या जनरेशनमधील मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) विकसित करण्यासाठी पाच अब्ज डॉलरच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू केले. एचएएलचे प्रमुख आर. माधवन यांच्या मते, आपण वेगाने विमान अपग्रेड करत असून अन्य कोणताही विक्रेता हा मलेशियाला एवढ्या वेगाने अपग्रेड व्हर्जन सादर करू शकेल, असे वाटत नाही. त्यांच्याकडे तेजस मार्क-2 चा पर्याय असताना ते एएमसीएबाबतही विचार करू शकतात. एवढ्या गतीने आपण अपग्रेड लढाऊ विमानाची सेवा देणार आहोत.
तेजसचे सुटे भाग विमानाला वजनाने हलके आणि अधिक सक्षम बनविणारे आहेत. तेजसवर लादण्यात येणारे बॉम्ब लक्ष्याचा अचूक वेध घेणारे आहेत. या लढाऊ विमानाला “तेजस’ हे नाव माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिले होते. क्षेपणास्त्र डागून जहाजांना लक्ष्य करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. ते एक मल्टीरोल लाइट एअरक्राफ्ट आहे. टेहळणी, अधिक्षेप (इंटरसेप्टिंग) याबरोबरच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तेजसवरून डागली जाऊ शकतात. पाकिस्तानच्या जेएफ-17 मध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत; परंतु त्याचे वजन खूपच जास्त आहे. त्यामुळे तेजस या विमानाला सहज लक्ष्य बनवू शकते. याखेरीज तेजसमध्ये जॅमर प्रोटेक्शन तंत्रज्ञान आहे. शत्रूच्या सीमेजवळ संदेशवहन बंद होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. तेजस 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के ऍल्युमिनियम ऍलॉय आणि टायटेनियम या धातूंचा वापर करून तयार झाले आहे. इतर लढाऊ जेट विमानांपेक्षा तेजसचे हे एक अनोखे वेगळेपण आहे. हे विमान 5300 किलोपर्यंत पेलोड एकाच वेळी वाहून नेऊ शकते.
पाकिस्तानी जेएफ-17 थंडर विमान केवळ 4300 किलो पेलोड वाहून नेऊ शकते. जेएफ-17 विमानाची इंधन क्षमता 2330 किलो असून, बाह्य टाकीतून 2400 किलो अतिरिक्त इंधन ते सोबत नेऊ शकते. तेजसची इंधन क्षमता 2458 किलो असून, 3725 किलो अतिरिक्त इंधन ते वाहून नेऊ शकते. आकाशाची छाती फाडून तेजस ताशी 1350 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. त्यामुळे कोणत्याही लढाऊ विमानाचा मुकाबला करण्यासाठी तेजस सक्षम आहे. फ्रान्सच्या “मिराज 2000’बरोबर तसेच अमेरिकेच्या “एफ-16’बरोबर आणि स्वीडनच्या “ग्रिपेन’बरोबर तेजसची तुलना केली जाऊ शकते. तेजसमधील इंटिग्रेटेड तंत्रज्ञान त्याला हवेत एकाच ठिकाणी खूप वेळ स्थिर ठेवू शकते. 1983 मध्ये रशियन मिग विमानांना पर्याय म्हणून तेजस ही हलकी लढाऊ विमाने ताफ्यात आणण्याची योजना भारताने तयार केली. तेजसचा पहिला प्रोटोटाइप 2001 मध्ये यशस्वीरीत्या आकाशात झेपावला होता; परंतु पहिली तेजस स्क्वाड्रन वायुसेनेच्या ताफ्यात 2016 मध्येच समाविष्ट झाली. याचे श्रेय तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले पाहिजे. भविष्यातील आव्हाने ओळखून स्वदेशी विमानांची निर्मिती करण्याच्या निर्धारावर ते ठाम होते.
भारतात सत्तरीच्या दशकापासूनच स्वदेशी लढाऊ विमाने असावीत, असा विचार पुढे आला होता; मात्र प्रत्यक्षात त्या दिशेने 80 च्या दशकात काम सुरू झाले. स्वदेशी विमानाचे पहिले उड्डाण 2001 मध्ये झाले. पन्नास वर्षांपूर्वी एनएफ-24 मरुत विमानांचा ताफा वायुसेनेत होता. त्यानंतर मात्र भारताने जग्वार, मिग, मिराज अशी विदेशी बनावटीची विमाने अधिक पसंत केली. त्यामुळे स्वदेशी विमानाच्या निर्मितीचा विचारच मागे पडला. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विमाने तयार करण्याच्या प्रक्रियेचा वेग आजही तुलनेने कमी आहे. तो वाढायला हवा. आज मलेशियासारख्या देशांनी आपल्या लढाऊ विमानांमध्ये स्वारस्य दाखवल्यामुळे आपल्याला एक मोठा आशेचा किरण दिसला आहे.
मलेशियासोबतचा करार पूर्णत्वाला जाणे ही बाब अनेकार्थांनी महत्त्वाची असणार आहे. कारण, संरक्षण साधनसामग्रीच्या क्षेत्राचे अर्थकारण खूप मोठे आहे. भारत हा संरक्षण साधनसामग्रीची आयात करणारा जगातील एक प्रमुख देश आहे. यासाठी अब्जावधी डॉलर्सचे विदेशी चलन भारताला खर्ची करावे लागते. हे लक्षात घेऊन विद्यमान शासनाने संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी भारत आता संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांशी खरेदीचे करार करताना तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उत्पादनांबाबत आग्रही राहात आहे. यामुळे देशांतर्गत, स्वदेशी बनावटीच्या संरक्षण सामग्रीला चालना मिळणार आहे. याखेरीज यातून देशात रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे.