लढा विरोधकांविरुद्ध नाही तर विशिष्ट तत्त्वप्रणालीशी
नवी दिल्ली, दि. 20 – कायदेभंग करण्याला लोकांना चिथावणी मिळू नये म्हणून सरकारला वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लावावी लागली, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सरकार विरोधकांचे असंतोष निर्माण करण्याचे साधन हिरावून घेतले गेले, हे सध्या देशात शांतता असण्याचे एक कारण आहे. पण मोठे कारण म्हणजे बहुसंख्य जनता विरोधकांशी सहमत नाही.
सरकारचा लढा आता विरोधकांशी नसून विशिष्ट तत्त्वप्रणालीविरुद्ध आहे. लोकशाहीवादी असूनही मला देशाचे ऐक्य राखण्यासाठी कडक कारवाई करावी लागली.
वटहुकुमाविरुद्ध कोर्टात जाता येणार नाही
नवी दिल्ली – युद्धाचे वेळी, परकी आक्रमणाचे भय असेल तर किंवा अंतर्गत दंगली वा बंडाळीची परिस्थिती या कारणास्तव राष्ट्रपती देशात आणीबाणी पुकारू शकतात. या जाहीरनाम्याविरुद्ध कोणासही कोर्टात जाता येणार नाही, हे स्पष्ट करणारे बिल घटना दुरुस्तीबिलाचे रूपाने केंद्र सरकार पार्लमेंटच्या येत्या अधिवेशनात मांडणार आहे.
ही घटनादुरुस्ती घटनेच्या 35 (2) या कलमाला सुचविण्यात येणार आहे. पार्लमेंटच्या येत्या अधिवेशनात हे बिल मंजूर करून घेण्यात येईल. आणीबाणी पुकारणे कायदेशीर आहे किंवा नाही याबाबत कोर्टात वाद उपस्थित केले जात आहेत.