मुंबई – आयपीएल स्पर्धा सुरु असताना ज्या संघांचे बाद फेरीतील आव्हान संपले असेल व त्यात जे खेळाडू भारतीय संघात टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडले गेले असतील त्यांना काही दिवसांचा ब्रेक देत अमेरिकेला पाठवले जाणार आहे. वेस्ट इंडिज व अमेरिकेत यंदा टी-२० विश्वकरंडक स्पर्धा रंगणार असल्याने तेथिल वातावरणाचा अभ्यास व्हावा व सराव करण्याचा अनुभवही मिळावा यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
यंदा या स्पर्धेचे यजमानपद वेस्ट इंडिजसह अमेरिकेलाही आहे. स्पर्धा १ जुनपासून सुरु होणार आहे. आयपीएल स्पर्धा २२ मार्चपासून २६ मे या कालावधीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नसले तरीही बीसीसआयने हा प्लॅन तयार केला आहे.
आयपीएल संपल्यावर भारतीय संघाला अमेरिकेत जाऊन किंवा वेस्ट इंडिजमध्ये जाऊन सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल संघातून खेळत असलेले असे जे खेळाडू आहेत की ज्यांची निवड भारतीय संघात झाली आहे त्यांना काही दिवसांसाठी न्युयॉर्कला पाठवले जाणार आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जुनला आयर्लंडशी होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व सहभागी २० संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संघाची घोषणा करावी लागणार असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. त्यासाठीच बीसीसीआयने हा प्लॅन तयार केला आहे.
पाकशी होणार न्यूयॉर्कमध्ये लढत
भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिम सुरु करेल. त्यानंतर स्पर्धेतील सर्वात चर्चिला जाणारा भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघातील सामना ९ जुनला न्युयॉर्कमध्येच होणार आहे. भारताचा समावेश पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा व यजमान अमेरिकेसह अ गटात करण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होत असून सर्व ५ गटात विभागले जाणार आहेत. प्रत्येक संघाला साखळी फेरीत प्रत्येकी ४ सामने खेळावे लागणार आहेत.