नवी दिल्ली : देशात पसरत चाललेल्या करोना व्हायरसविरोधात सरकारकडून त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नांना आता भारतीय लष्कराची साथ मिळणार आहे. त्यासाठी या लढ्याला लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ असे नाव देण्यात आले आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राला याविषयी माहिती दिली.
“देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत. COVID-19 चा फैलाव रोखण्यासाठी ही पावले आवश्यक होती” असे मनोज नरवणे यांनी सांगितले.
Indian Army has code-named its anti #COVID19 operations as Operation Namaste. Army has, so far, established eight quarantine facilities across the country. pic.twitter.com/bmQh1Zr4Ua
— ANI (@ANI) March 27, 2020
“आमच्याकडे आपत्कालीन योजना तयार आहे. करोना व्हायरसच्या फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असे नरवणे म्हणाले. ज्या गोष्टी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्या परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा नव्याने आखणी केली जाईल” असे नरवणे म्हणाले. मानेसर, जैसलमेर आणि जोधपूर येथे लष्कराने क्वारंटाइन केंद्रे उभारली आहेत. चीन, इटली आणि इराणहून आणलेल्या भारतीयांना इथे ठेवण्यात आले होते. आणखी चार ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारण्यात येणार आहेत अशी माहिती नरवणे यांनी दिली.