मुंबई :- भालाफेकपटू नीरज चोप्रा, बुद्धिबळातील प्रतिभावान आर प्रज्ञानानंद आणि बॅडमिंटन स्टार एचएस प्रणॉय यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना, येत्या 10-15 वर्षांत भारत क्रीडा क्षेत्रात एक मोठी ताकद म्हणून उदयास येईल, असे दिग्गज सुनील गावसकर यांनी सोमवारी सांगितले.
चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला, तर प्रज्ञानानंदने गेल्या आठवड्यात 18 व्या वर्षी विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. प्रणॉयने जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक जिंकण्याच्या मार्गावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर एक्सेलसनचा पराभव केला.
मिडविकेट स्टोरीजचे प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर गावसकर यांनी सांगितले की, पूर्वी, तुम्हाला फक्त काही खेळांबद्दल बोलले जाताना दिसायचे. मीडिया कव्हरेजही फक्त त्यांच्यासाठीच असायचे. आता सर्व खेळांना एक आउटलेट आणि एक्सपोजर मिळाले आहे आणि इतर खेळांमुळे, आम्हाला क्रीडा क्षेत्रातले नवे तारे-तारका पहायला मिळत आहेत.
बुडापेस्टमध्ये विश्वविजेता बनण्याच्या चोप्राच्या विजयी क्षणाचा साक्षीदार असताना लिटल मास्टर आनंदाने भरून गेला होता. मला आठवतं जेव्हा त्याने (नीरज चोप्रा) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं, तेव्हा भारत-इंग्लंड मालिका सुरू होती… मी इंग्लंडमधून पाहत होतो, आणि मला ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ हे गाणे गाण्यास सांगितले गेले, काल मलाही असाच अनुभव आला, असे गावसकर म्हणाले.