वॉशिंग्टन – भारताला आपल्या मोठ्या मनुष्यबळाचा चांगला लाभ घेता आलेला नाही असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. भारताला डेमोग्राफिक डिव्हीडंट घेता आला असता पण आपण या मनुष्यमळाचा लाभ घेण्यात कमी पडलो आहोत. त्यासाठी भारतातील मनुष्यबळतील कौशल्य विकासाकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र कसे बनवता येईल या विषयावरील एका परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, चीन आणि कोरिया यांनी त्यांच्या मनुष्यबळाचा चांगला लाभ घेतला आणि त्यामुळे त्यांचा जीडीपी वाढला आहे. आपण यात कमी पडलो आहोत. भारतात लोकांना नोकऱ्या मिळू शकत नाहीत, त्या त्यांना पुरेशा प्रमाणात द्यायला हव्या होत्या असे ते म्हणाले. आपल्याकडील लोकांच्या क्षमता वाढवणे, उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे असून आपल्याला या दोन्ही आघाड्यांवर काम करणे आवश्यक आहे.
राजन म्हणाले की, रोजगार निर्मितीवर व्यापक अर्थाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लोकांना चांगले रोजगार मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात ॲपरेंटिसशिपची जी योजना आहे ती या दृष्टीने उपयुक्त आहे असे ते म्हणाले. चांगल्या नोकरीसाठी मुलांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांच्यात कौशल्य विकासही करणे गरजेचे आहे या कामी ही ॲपरेंटिसशिप योजना यशस्वी होईल असा दावा त्यांनी केला.
भारत चिप उत्पादनावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत असल्याची टीका राजन यांनी केली. या चिप कारखान्यांचा विचार कर, चिप मॅन्युफॅक्चरिंगला अब्जावधींची सबसिडी मिळणार आहे, पण ज्या क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या देण्याची क्षमता आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच भारतात नोकऱ्यांची मोठी समस्या आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
एका प्रश्नाला उत्तर देताना राजन म्हणाले की, बरेच भारतीय नवसंशोधक आता सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये तेथील उद्योग सेट अप करण्यासाठी जात आहेत कारण त्यांना तेथे बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे खूप सोपे आहे. माझ्या मते विराट कोहलीची मानसिकता असलेला तरुण भारतात आहे. यापूर्वी आपल्या सादरीकरणात राजन म्हणाले की, सेवा, उत्पादन, कृषी बांधकाम यापैकी कोणतेही क्षेत्र निवडले तरी भारतात समस्या आहे असे राजन यांनी सांगितले.