लखनौ – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव पहिलवान होते. कुस्तीचे डाव टाकण्यात तरबेज होते. मात्र राजकारणातही ते तेवढेच निष्णात होते. एक रणनीती तयार करूनच त्यांच्या हालचाली होत असत. असाच एक डाव त्यांनी १९९९-२००० मध्ये टाकला होता. त्याद्वारे त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजे अखिलेश यादव यांना थेट संसदेत पाठवले होते.
अखिलेश यांना तेंव्हा पोटनिवडणुकीत दिलेली उमेदवारी अचानक घेतलेला निर्णय असावा असे कोणालाही वाटू शकते. मात्र मुलायम अचानक काहीच करत नसत आणि जे करत ते अचानक केल्यासारखे भासवून लोकांची मने जिंकत असत आणि मैदान मारत असत. अखिलेश यांच्या राजकारणातील प्रवेशाच हाच खास किस्सा आता चर्चेत आला आहे.
त्याचे झाले असे की १९९९ ची लोकसभा निवडणूक मुलायम सिंह यादव यांनी कन्नोज आणि संभल या दोन जागांवर लढवली होती व दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला. नंतर त्यांनी नियमानुसार एक जागा सोडायची म्हणून कन्नोजचा राजीनामा दिला. २००० साली पोटनिवडणुकीची घोषणा झाली. कन्नोज येथे मुलायम यांच्या सभेचे एका शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते.
समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह, आझम खान आणि अन्य बडी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. एक युवकही तेथे हजर होता मात्र तो फारसा परिचित नव्हता. नेत्यांची भाषणे सुरू असताना अमरसिंह यांनी मुलायम यांच्या कानात काहीतरी सांगितले. मात्र मुलायम यांनी नकारार्थी मान हलवली. त्याचवेळी आझम खानही मुलायम सिंह यांना काही सांगत होते. थोडक्यात त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता.
थोड्या वेळाने मुलायम सिंह भाषणाला उभे राहीले. भाषण सुरू असतानाच त्यांनी अखिलेश यांचा हात हातात धरत हात वर केला. ते उपस्थित समुदायाला उद्देशून म्हणाले बेटा छोडकर जा रहां हूं, सांसद बना देना!
मुलायम सिंहांच्या त्या एका वाक्याने उपस्थितांमध्ये चैतन्य संचारले आणि एकच जल्लोष झाला व अखिलेश यांच्या उमेदवारीचे स्वागत झाले. कार्यक्रम संंपल्यावर अखिलेशही अन्य नेत्यांसह आपल्या पित्यासोबत मंचावरून खाली उतरू लागले. त्यावेळी मुलायम सिंह यांनी तुम्ही कुठे निघालात असा सवाल करतानाच आता तुम्हाला येथेच राहुन प्रचार करायचा असल्याचे त्यांना सांगितले.
त्या पोटनिवडणुकीत अखिलेश कन्नोज येथून विजयी झाले. त्यावेळी प्रचंड फॉर्मात असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या अकबर अहमद डंपी यांचा त्यांनी पराभव केला. नंतर २००४, २००९ मध्येही अखिलेश कन्नोजच्या जागेवरून विजयी झाले आणि पुढे २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर पोहोचले.