South Africa vs India 2nd Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात गडी राखून सहज जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली आहे. दुसऱ्याच दिवशी भारताने दुसरी कसोटी जिंकली. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान होते. सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना आपले बळी बनवले.
India emerge victorious within five sessions of play in the Cape Town Test to level the #SAvIND series 👊#WTC25 | 📝: https://t.co/eiCgIxfJNY pic.twitter.com/XpqaIEBeGk
— ICC (@ICC) January 4, 2024
भारतानं रचला इतिहास…
केपटाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. भारतानं येथे प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केपटाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तर दोन कसोटी अनिर्णित राहिल्या. भारताने केपटाऊन कसोटी जिंकून मालिकेतही 1-1 अशी बरोबरी साधली.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2010-11 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती.
आफ्रिकेचा 7 गडी राखून केला पराभव…
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 55 धावांवरच मर्यादित राहिला. त्यानंतर भारत 153 धावांवर ऑलआऊट झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात 173 धावा केल्या. त्यामुळे भारताला 79 धावांचे लक्ष्य मिळाले आणि टीम इंडियानं तीन गडी गमावून त्याने हे लक्ष्य गाठले.
दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. यशस्वीच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. 23 चेंडूत 28 धावा करून तो बाद झाला. त्याने सहा चौकार मारले. आंद्रे बर्गरच्या चेंडूवर तो ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद झाला.
भारताला दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले. शुभमनने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. विराट कोहली बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. तो 11 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को जॅनसेनच्या चेंडूवर यष्टिरक्षक काइल वेरेयनने झेल घेत विराटला बाद केलं. रोहित शर्मा (17 धावा) आणि श्रेयस अय्यर (4 धावा) यांनी सामना संपवला.
आफ्रिकेचा दुसरा डाव 173 वर आटोपला…
दुसऱ्या डावात सलामीवीर एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेकडून शानदार शतक झळकावले. मार्करामने 103 चेंडूत 106 धावांची खेळी खेळली. मार्करामने दमदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला डावाच्या पराभवापासून वाचवले. मार्करामने आपल्या शतकी खेळीत 17 चौकार आणि 2 षटकार मारले.
एकटाच लढला एडन मार्करम…
पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर यश मिळाले नाही. मात्र, एडन मार्कराम एकटा उभा राहिला. एका बाजूला सतत विकेट पडत राहिल्या तर दुसऱ्या बाजूला मार्कराम वेगाने धावा काढत राहिला. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने खेळ सुरू केला तेव्हा एडन मार्कराम आणि डेव्हिड बेडिंगहॅम क्रीजवर होते. याआधी पहिल्या दिवशी शेवटच्या कसोटी डावात डीन एल्गर 12 धावा, टोनी डीजॉर्ज 01 आणि ट्रस्टन स्टब्स 01 धावा करून बाद झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी डेव्हिड बेडिंगहॅम 11 , यष्टिरक्षक फलंदाज काइल व्हर्न 09, मार्को जॅनसेन 11, केशव महाराज 03, कागिसो रबाडा 02 आणि लुंगी नगिडी 08 धावा करून बाद झाले.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात कहर केला तर जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात पाहुण्या संघासाठी अडचणीचा ठरला. बुमराहने दुसऱ्या डावात 61 धावांत 6 बळी घेतले. बुमराहसमोर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज अस्वस्थ दिसत होते. बुमराहने ट्रस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हर्न, मार्को जॅनसेन, केशव महाराज आणि लुंगी नगिडी यांना आपले बळी बनवले. बुमराहशिवाय दुसऱ्या डावात मुकेश कुमारने दोन आणि मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पहिल्या डावात आफ्रिका 55 धावांत गारद
याआधी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडल्या होत्या. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 धावांत आटोपला. यानंतर भारताने पहिल्या डावात 176 धावा केल्या होत्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली होती. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने अवघ्या 15 धावांत 6 बळी घेतले.