India vs England 3rd Test (Stumps, Day 3) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस शनिवारी खेळला गेला. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला.
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. यासह दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी आतापर्यंत 322 धावांची झाली आहे. कुलदीप यादव तीन धावांवर तर शुभमन गिल 65 धावा काढून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. रोहित (19) आणि रजत पाटीदार (0) यांच्या रूपाने भारताला दोन धक्के बसले. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राजकोट कसोटीला आता दोन दिवस उरले आहेत. भारताच्या अजूनही 8 विकेट आहेत. तसेच भारतानं 300 हून अधिक धावांची आघाडीही घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी येथे थोडे कठीण झाले आहे.
End of a magnificent day with the bat & ball! 🙌#TeamIndia reach 196/2, with a lead of 322 runs
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/y30QqTGtk4
— BCCI (@BCCI) February 17, 2024
त्याचवेळी पाठदुखीमुळे 133 चेंडूत 104 धावा करून यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. तो पुढे फलंदाजीला येणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
त्यापूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी मिळाली.
IND vs ENG 3rd Test Day 3 : शतकवीर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट; समोर आलं ‘हे’ कारण…
यशस्वीचे शतक तर गिलचं अर्धशतक
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. त्याने दुसऱ्या म्हणजे शेवटच्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. त्याने 122 चेंडूत शतक झळकावले. दरम्यान, त्यानंतर शुभमन गिलनेही 98 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.हे अर्धशतक त्यानं षटकार लगावत पूर्ण केलं. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे 5वे अर्धशतक आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात गिलला खातेही उघडता आले नाही. अशा स्थितीत त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून पुनरागमन केले आहे.
इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला….
दुसऱ्या दिवशी बेझबॉल क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत 35 षटकांत 2 बाद 207 धावा केल्या होत्या. पण इंग्लंडला तिसऱ्या दिवशी ही लय राखता आली नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 8 विकेट गमावल्या, त्यानंतर भारताला 126 धावांची आघाडी मिळाली.
इंग्लंडने कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ज्या दमदार पध्दतीने फलंदाजी करत खेळ केला, ते पाहता ते तिसऱ्या दिवशी सहज आघाडी घेतील, असा अंदाज बांधला जात होता, कारण त्याच्या 8 विकेट्स शिल्लक होत्या, मात्र तसे झाले नाही. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट करत इंग्लिश संघाचा खेळ खराब केला.
भारतीय संघ 445 धावांत सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजीला उतरताना चांगली सुरुवात केली. सलामीला आलेल्या जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची (80 चेंडू) भागीदारी केली. इंग्लिश संघाला पहिला धक्का 14व्या षटकात जॅक क्रॉलीच्या रूपाने बसला, जो 28 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बेन डकेट आणि ऑली पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची (102 चेंडू) भागीदारी केली. मोहम्मद सिराजचा बळी ठरलेल्या ओली पोपच्या रूपाने इंग्लंडने दुसरी विकेट गमावली. पोपने 55 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी फलंदाज जो रूटच्या रूपाने इंग्लंडने तिसरी विकेट गमावली. रूट 31 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 18 धावा करून बाद झाला. रुटच्या विकेटनंतर इंग्लंडला काही विशेष धावा करता आल्या नाहीत.
20 धावांच्या आत इंग्लंडचे 5 फलंदाज बाद
त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स 41 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टोक्सच्या विकेटनंतर इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 299 होती. त्यानंतर संपूर्ण संघ 319 धावांवर बाद झाला. इंग्लंडला सातवा धक्का बेन फॉक्सच्या (13) रूपाने, आठवा रेहान अहमदच्या (06) रूपाने, नववा टॉम हार्टलीच्या (09) रूपाने आणि दहावा धक्का जेम्स अँडरसनच्या (01) रूपाने बसला.
अशी होती भारतीय गोलंदाजी…
या काळात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 यश मिळवले. तर अश्विन आणि बुमराहला 1-1 विकेट मिळाली.