संदीप राक्षे
पृथ्वीराज चव्हाणांसमोर कॉंग्रेसच्या पुनर्बांधणीचे आव्हान
सातारा- राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा कळसाध्याय ठरेल, अशी राजकीय लढाई लढताना धुरंधरपणाने भाजपची रणनीती भेदण्यात यश मिळवले. महाविकाआघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याने जिल्ह्यात शिवसेनेला उभारी मिळणार असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घड्याळाची टिकटिक पुन्हा जोर धरणार आहे. या परिस्थितीत कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेतील मरगळ झटकून पुनर्बांधणी करण्याचे आव्हान माजी मुख्यमंत्री व सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना पेलावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सत्तेचा समतोल साधला जाणार असला तरी अखेरीस रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे असेल, हे स्पष्ट आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचे दोन व कॉंग्रेसचा एकमेव आमदार आहे. मात्र, राजकीय केंद्रबिंदू कराडकडे सरकणार असल्याची दाट चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणचे कॉंग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण व पाटणमध्ये शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांच्यामुळे कराड हे राजकीय हालचालींचे केंद्र होणार, यात शंका नाही. या तिन्ही दिग्गजांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे. भविष्यात जिल्ह्याचे राजकारण बहुपक्षीय होणार असले तरी विकासाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. आ. मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना न्याय देण्याचा पवारांचा आग्रह राहिल्यास जिल्ह्यात पूर्व-पश्चिम असा समतोल साधता येणार आहे.
सत्ता स्थापनेतील प्रमुख भूमिकेमुळे शिवसेनेला जिल्ह्यात उभारी मिळण्याची चिन्हे आहेत. आ. शंभूराज देसाई यांचा राजकीय अनुभव आणि त्यांना कोरेगावचे आ. महेश शिंदे यांची खंबीर साथ मिळणार असल्याने शिवसेनेला “अच्छे दिन’ येतील. जिल्ह्याचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील व जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे मोठी जबाबदारी सोपवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माणमधील शेखर गोरे यांनासुद्धा पुन्हा सक्रिय होण्याची संधी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हा कळीचा मुद्दा आहे. माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे काम डीपीसीच्या बैठकांपुरते मर्यादित राहिल्याने शिवसैनिकांनाही त्यांच्याबद्दल फारशी आस्था नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराला पालकमंत्रिपद द्यावे, असा एक मतप्रवाह आहे. याबाबतचा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील.
फडणवीसांची आश्वासने ठाकरे पूर्ण करणार?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराची हद्दवाढ व सातारा शहराच्या रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपये व मेडिकल कॉलेजसाठी स्वतंत्र इमारत या महत्वपूर्ण घोषणा साताऱ्याच्या प्रचारसभेत केल्या होत्या. मात्र राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाशिव आघाडीचे सरकार गुरुवारी सत्ता ग्रहण करणार आहे. शरद पवार व उध्दव ठाकरे हे सातारा जिल्ह्याच्या प्रश्नांशी खूप जवळून निगडीत आहे. फडणवीसांनी सातारकरांना दिलेली आश्वासने उध्दव ठाकरे पूर्ण करणार का? याची खरी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
-जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न
-जिहे-कठापूर योजनेची पूर्तता
-मेडिकल कॉलेजची उभारणी
-सातारा शहराची हद्दवाढ
-शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई
-जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा
-अनुशेष भरून काढणे
-कालवा निर्मिती व अस्तरीकरणासाठी भरीव निधी
-वाळू लिलाव व डेपो विकसनाचे पर्यावरणदृष्ट्या प्रयत्न
-राज्य व जिल्हा महामार्ग मजबुतीकरण