संतोष पवार
जिल्ह्यात समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची व्यूहरचना
सातारा – राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीचा उद्या, दि. 28 रोजी शपथविधी होत असून जिल्ह्यातील कोणाकोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार यावर सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. राजकीय वर्तुळात सध्या याचीच जोरदार चर्चा आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपला असून नुकतीच या पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. हे पद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी आहे. जिल्हा परिषदेतील सद्य राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास अध्यक्षपदाच्या शर्यतीत संजीवराजे, मसूरचे ज्येष्ठ नेते मानसिंगराव जगदाळे, शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, मायणीचे सुरेंद्र गुदगे यांची चर्चा आहे. संजीवराजे यांनी पदाधिकारी, अधिकारी, सदस्यांच्यात समन्वय साधून चांगला कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळात आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
आ. मकरंद पाटील यांना संधी मिळाल्यास जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी लागावी, असा पक्षाकडे आग्रह राहणार नाही. आ. बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास मानसिंगराव जगदाळे यांची अध्यक्षपदाची संधी हुकेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे या पदावर संजीवराजे, राजेश पवार व सुरेंद्र गुदगे हेच हक्क सांगतील, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळात ज्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळेल, त्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपद दिले जाणार नाही, हे साहजिकच आहे.
जिल्ह्यात ज्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कमकुवत असेल त्या मतदारसंघातील सदस्याला अध्यक्षपद देऊन ताकद वाढवण्याचाही विचार केला जाऊ शकतो. अध्यक्षपद निवडीला अजून महिना बाकी असला तरी समतोल साधून प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीची फळी भक्कम करण्याचा विचार करून अध्यक्षपद दिले जाईल. ही संधी देताना लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतील कामही तपासले जाणार आहे. पक्षाने जिल्हा परिषद गटनिहाय आकडेवारी जमवली असून त्याची पडताळणी करूनच अध्यक्षपद व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतील.