पुणे/सहकारनगर, दि. 22 (प्रतिनिधी) -समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन ही पायाभूत कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असे असताना कर्जकाढून पाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मीटरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. काम पूर्ण होण्यास नेमका किती वेळ लागणार आहे, हे सांगता येत नाही. मग कर्ज काढून खरेदी केलेल्या मीटरच्या व्याजासाठी पुणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी नेमकी कोणाचे “मीटर’ चालविण्यासाठी केली जात आहे, असा सवाल उपस्थित करीत ऋण काढून सण करणे थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली सेल पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले. यावेळी सेलचे स्वप्निल दुधाने, गणेश नलावडे, स्वप्निल खडके, मदन वाणी, प्रशांत गांधी, प्रमोद इंदापूरकर, सुमित मोरे, राजाभाऊ घोलप, मच्छिंद्र उतेकर, प्रमोद शिंदे, चंदन जगताप आदी उपस्थित होते.
पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे मीटर बसविल्यानंतर लगेच शहरातील नागरिकांना अतिरिक्त पाणीवापर करीत असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने नोटीस देण्यात आल्या. या योजनेंतर्गत घरोघरी पाणी मीटर बसवण्याच्या अगोदर महापालिकेच्या विविध इमारती आणि कार्यालयांमध्ये पाणी मीटर बसविणे गरजेचे आहे. शहराला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. मात्र शहराच्या वाढीव हद्दीचा आणि लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करून घेणे गरजेचे आहे. त्यापूर्वी मीटर बसविण्याची घाई महापालिकेकडून केली जात आहे.
अगोदर ही कामू पर्ण करा…
विविध जलशुद्धीकरण केंद्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी व विविध परिसराना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण खराब झाल्या आहेत. नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. काही परिसरांत जलवाहिन्या टाकून एक ते दोन वर्षे झाली मात्र अद्याप त्यांची तपासणी (टेस्टिंग) झालेली नाही. योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू आहेत. कामे पूर्ण झालेल्या टाक्या विनावापर स्थितीत आहेत. त्यामुळे त्या खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या टाक्या त्वरित नागरिकांच्या सेवार्थ सुरू कराव्यात.