मांडवगण फराटा : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील टोकर वाट, बुवांचा मळा या परिसरातील 25 एकर ऊस जळून खाक झाला.
पांडुरंग अशोक रणदिवे, दादा रंगनाथ रणदिवे, श्रीपती रणदिवे, रामदास गजानन रणदिवे, पंढरीनाथ लक्ष्मण रणदिवे, पांडुरंग विठ्ठल रणदिवे, सुरेश चंद्रर रणदिवे, गेनभाऊ शिंदे, बाळासाहेब शितोळे अशी या घटनेत ऊस जळलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (दि. 21) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
हा ऊस तोडणीला आलेला होता. एकमेकांच्या शेजारी शेतकऱ्यांचे ऊस असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व परिसरातील अडसाली ऊस, खोडवा ऊस, लागण ऊस पूर्णपणे आगीत जळून भस्मसात झाला आहे. या आगीत शेतकरी वर्गांचे पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी काढण्यासाठी ठेवलेले वॉल्व्ह पूर्णपणे जळून गेले आहेत. उसाला लागलेल्या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. या भागात विजेचे भारनियमन असल्यामुळे वीज पुरवठा बंद होता.
ऊस कोणी पेटवून दिला का? कोण उसाचे पाचट दुपारी पेटवत होते का त्यामुळे आग लागली का इतर कोणत्या कारणामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग प्रचंड प्रमाणात असल्यान आगीच्या ज्वाला उसातून दुसऱ्या शेतकऱ्याच्या उसात पसरत होत्या. या भागातील कारखान्याच्या गुऱ्हाळाच्या ऊस तोडी सुरू होत्या; परंतु आगीचे रौद्र रूप पाहून ऊस तोडणी बंद करून या भागातील ऊस तोडणी कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. शेतकरी वर्गाने ऊस पेटू नये म्हणून ट्रॅक्टरच्या साह्याने आगीपासून दूर अंतरावर उसाच्या शेतात ट्रॅक्टर घालून रोटर वेटरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.