आंबेगाव बुद्रुक, दि. 22 (प्रतिनिधी) -नवले पूल ते कात्रज बोगदा या टप्प्यात रस्ते बांधणीत मोठ्या चुका झालेल्या असल्यानेच सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाने केला आहे.
या रस्त्याच्या आराखड्याबाबत तसेच उपाययोजना करण्याबाबत महासंघाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवळी मागणी केली आहे. परंतु, याबाबत कोणतेही ठोस काम करण्यात आले नसल्याचे वाहतूकदार संघटनेचे म्हणणे आहे. या रस्त्यावर जड वाहनांना स्वतंत्र लेन ठेवली तरी अपघात टळू शकतील परंतू, याकडे प्राधिकारणासह संबंधीत अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
नवले पुलादरम्यान महामार्गावर रविवारी (दि.20) रात्री भरधाव ट्रकच्या धडकेने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात 35 ते 40 वाहनांचे नुकसान झाले. त्यातच आज (मंगळवार) पुन्हा कंटेनर दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातामुळे नवले पूल ते कात्रज बोगदा या टप्प्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाने रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना यापूर्वीही सुचविल्या आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह सामान्य नागरिकांना बसत आहे.
नवले पुलाचा परिसर साततच्या अपघातांमुळे धोकादायक झाला आहे. वाहतूकदार आणि वाहतूक क्षेत्रातील कार्यरत असल्याने या भागातील रस्त्याच्या त्रुटी आम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मात्र, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून उपयोग होणार नाही. यावर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघ