कोल्हापूर – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भक्कमपणे उभा आहे. कोणीही उठून शरद पवार यांच्या नावे भाष्य करतो. प्रसिद्धी मिळवायची असेल तर शरद पवार यांच्यावर बोला असे गणित तयार झाले असल्याचे ते म्हणाले. ज्यांना समाजाचा पाठिंबा मिळालेला नाही असे लोकच अशी भाष्यं करतात. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतिक्रिया देत नाही. पण यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या नसतात. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती मोठ्या संख्येने उभा आहे ते शनिवारच्या (दि.23) सभेतून सर्वांना कळेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका करणाऱ्यांना केला.
जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे शनिवारी होणाऱ्या संकल्प सभेच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन सभेचा आराखडा मांडला. यावेळी ते बोलत होते. मागील काही महिन्यांपासून शरद पवार यांच्या नावे भाष्य करणाऱ्यांचे त्यांनी कान टोचले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, राज्यात आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलेले नैराश्य झटकून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचे सामर्थ्य देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला. याचा महाविकास आघाडीच्या गठबंधनाशी कोणताही संबंध नाही. परंतु राज्यात जिथे तीनही पक्षांना एकत्र येण्याची संधी आहे तिथे आम्ही नक्कीच एकत्र येऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करण्याला प्रथम प्राधान्य देईल, असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.