नवी दिल्ली – कॉंग्रेसमध्ये पूर्ण एकजूट असल्याने राजस्थान सरकारला कुठलाही धोका नाही. सरकार पाडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास भाजपच्या पदरी अपयशच येईल, असे राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी सोमवारी म्हटले.
काही महिन्यांपूर्वी तरूण नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार संकटात सापडले होते. मात्र, पालयट आणि कॉंग्रेसमध्ये समेट झाल्याने ते सरकार तरले.
पायलट यांच्या बंडामागे भाजपच असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने करण्यात आला. आता पुन्हा राजस्थानचे राजकारण चर्चेचा विषय बनण्याला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा एक आरोप कारणीभूत ठरला आहे.
राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून पुन्हा होऊ शकतो, असे गेहलोत यांनी म्हटले. त्यापार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माकन यांनी राजस्थान सरकारच्या स्थैर्याची ग्वाही दिली. बंडामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले. त्यांच्याकडे अजूनपर्यंत कुठली जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.
मात्र, पायलट यांचे महत्व विषद करताना माकन यांनी त्यांना पक्षाचा मौल्यवान नेता म्हटले. त्याचवेळी गेहलोत यांचा प्रामाणिक राजकारणी आणि अनुभवी लढवय्या म्हणून उल्लेख केला.