मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांसह शिंदे गटातील काही नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त मिळाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यात येत्या १० ते १२ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
नवीन मंत्रिमंडळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी पाच नेत्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना सध्या तरी पूर्णविराम मिळणार आहे.
मागच्या एक वर्षांपासून मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने शिंदे गटातीन अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात होता. दुसरीकडे, शिंदे-फडणवीस सरकारचा केवळ दीड वर्षांचा कार्यकाल बाकी आहे. त्यामुळे नव्याने मंत्रीमंडळ विस्तार केला तर भाजपा व शिंदे गटातील अनेक आमदार नाराज होऊ शकतात, त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार केला जात नसल्याचे म्हटले जात होते. पण येत्या १० ते १२ दिवसात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.