Ranji Trophy 2024, Ajinkya Rahane – यंदाच्या मोसमात भले माझ्या धावा झाल्या नसतील; परंतु मी वानखेडे स्टेडियमवरचा सर्वांत आनंदी खेळाडू आहे, अशी भावना मुंबई कर्णधार अजिंक्य रहाणेने आठ वर्षानंतर मुंबईला पुन्हा रणजी विजेतेपद मिळवून दिल्यानंतर व्यक्त केली.
रहाणेला या मोसमात केवळ २१४ धावाच करता आल्या. मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो नवव्या स्थानावर आहे; परंतु या अंतिम सामन्यातील अखेरच्या डावात त्याने ७३ धावांची खेळी केली आणि त्याने मुशीर खानसह केलेल्या १३० धावांच्या भागीदारीमुळे मुंबईला मोठी मजल मारता आली. खेळाडू म्हणून चढ-उतार होत असतात; परंतु ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांचे यश साजरे करण्यातून संघ भावना वाढते आणि त्याचा फायदा मैदानावर संघाला होत असतो, असे रहाणे म्हणाला.
गतवर्षी आम्ही केवळ एका धावेने साखळीतच बाद झालो होतो. त्यामुळे यंदाच्या मोसमात आम्हाला मुंबई संघाचा दरारा पुन्हा निर्माण करायचा होता, त्यासाठी तंदुरुस्तीपासून मानसिकताही सक्षम करायची होती, असे सांगणाऱ्या रहाणेने विदर्भ संघाने केलेल्या जिगरबाज खेळाचेही कौतुक केले.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
धवल कुलकर्णी म्हणाला की, देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असलो तरी ज्या क्रिकेटने मला सर्वस्व दिले त्याचीच सेवा मला कोणत्या ना कोणत्या जबाबदारीतून करायचीय, असे मत निवृत्त झालेल्या धवल कुलकर्णीने व्यक्त केले. विदर्भचा नववा फलंदाज बाद झाला तेव्हा शार्दुल ठाकूरने मला गोलंदाजी द्यावी, असे मत रहाणेकडे व्यक्त केले. मलाही गोलंदाजी करायची होती आणि संधीच मिळताच मी माझ्या कारकिर्दीची सांगता विकेट मिळवून केली. खरे तर या सामन्यात मुंबईकडून पहिली विकेटही मीच मिळवली होती, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.