भुवनेश्वर – देशात करोनाने थैमान घातलेले असतानाच आता भारताला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाचा भारताच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून “अम्फान’ नावाचे चक्रीवादळ दोन दिवसांत धडकणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या खाडीजवळ आणि अंदमान बेटाजवळील समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अंदमान निकोबार, ओदिशा, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यात 17 ते 20 मे रोजी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चक्रीवादळादरम्यान ताशी 55 ते 65 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हा वेग वाढत जाऊन 75 किमी इतका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी केला आहे.
ओदिशासोबत पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझारोम, मणिपूर या ठिकाणीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय डोंगराळ भाग असलेल्या जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान या ठिकाणीही वातावरणात बदल जाणवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे. त्याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे बोलले जात आहे. केरळमध्ये चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नसला तरी रविवारी (17 मे) मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.