पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत ६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, तर महापालिकेस १५ जुलैपर्यंत आणखी ३ टीएमसी पाण्याची गरज आहे. हे पाणी उपलब्ध असले तरी पाण्याची स्थिती पाहता ३१ मे या दिवशी पुन्हा एकदा पाण्यासाठी पाटबंधारे विभागासह आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.
शहरात दुरूस्तीच्या नावाखाली कोणतीही पाणी कपात करण्यात आलेली नाही. तातडीची कामे आवश्यक असल्यानेच पाणी बंद ठेवण्यात आल्याचा खुलासा आयुक्तांनी केला आहे. मात्र, त्याच वेळी धरणातील पाण्याचे काटोकाट नियोजन असल्याने पावसाने हुलकावणी दिल्यास शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावण्याची भिती आहे.
धरणात सहा टीएमसी पाणी
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात अवघा सहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार, ३ टीएमसी पाणी महापालिकेस दिले जाणार आहे. तर अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन गृहीत धरण्यात आले असून अर्धा टीएमसी पाणी पालखीसाठी ठेवण्यात येणार आहे.
तर, जिल्ह्यातील सिंचन योजना आणि दौंडच्या पाणी पुरवठयासाठी दिड टीएमसी पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याचे नियोजन पाहता हे पाणी १५ जुलैपर्यंंतच असणार आहे. त्यामुळे, पाऊस लांबल्यास शहरावर मोठे पाणी संक़ट ओढावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
टॅंकरची संख्या वाढली
महापालिकेकडून शहरात पाण्याची कपात करण्यात आलेली नसली तरी दुसऱ्या बाजूला मात्र शहरात पाण्याच्या टॅंकरची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात शहरात सात ते आठ दिवस पाऊस झालेला असला तरी पाण्याची मागणी कायम असून २० मे अखेर पर्यंंत पाण्याच्या टॅंकरच्या संख्येने ३० हजारांचा आकडा पार केला आहे.
“महापालिकेसाठी १५ जुलैपर्यंत पाऊने तीन ते तीन टीएमसी पाण्याची गरज आहे. तेवढा पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे तूर्तास कपात केलेली नसली तरी ३१ मे या दिवशी पाण्याचा पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.” – राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त