नगर – “लॉकडाउन’ मुळे नागरिकांना घरात राहणे बंधनकारक असताना नगर शहरासह उपनगरात विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मनोरंजनाचीही साधने, पंखे आणि एसीही बंद पडत असल्याने लहान मुले व ज़्येष्ठ नागरिक उकाड्याने हैराण होत आहे. महावितरण विभागाने लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा असे, निवेदन भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष पंकज जाहागीरदार यांनी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना दिले आहे.
शहरातील केडगाव, सावेडी, पंचपीर चावडी, मुकुंदनगर, गोविंदपुरा, विनायकनगर, पाईपलाईन रस्ता, मध्य नगर शहर अशा अनेक भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. काहींनी “महावितरण’ च्या कार्यालयाला फोन केल्यावर कधी रेंज नाही तर कधी फोन लागत नाही, अशी स्थिती होती. शिवाय, कार्यालयात जाऊन तक्रार देण्यासाठी बाहेर जाण्याचा पर्यायही संचारबंदीमुळे उपलब्ध नसल्याने नागरिकांची दुहेरी कोंडी झाली.
लॉकडाऊन काळात नागरिकांचे वर्क फ्रॉम होम सुरू असून इंटरनेट चा वापर ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वीज नसल्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. अचानक वीज जाण्यामुळे घरातील विद्यूत उपकरणे बंद पडत आहेत.
याबाबत नगरसेवक जगन्नाथ निंबाळकर, धनंजय जामगावकर, सचिन चोरडिया, मंगेश खंगले, बाळासाहेब सातपुते, अरुण नरवडे, व इतर कार्यकर्ते व नागरिकांशी चर्चा केली असता सर्व केडगाव मध्येहीच परिस्थिती असल्याचे समजले आहे. याबाबत अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता धर्माधिकारी यांच्याशी फोन वरून चर्चा लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
“लॉकडाउन’ च्या काळात “करोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यानुसार नगरमधील नागरिकांनी ‘लॉकडाउन’ला प्रतिसाद देताना संपूर्ण कुटुंब घरातच राहात आहे; मात्र, अशावेळी घरात वीजपुरवठा महत्त्वाचा आहे. तसेच आठवडाभरापासून तापमानातही वाढ झाल्याने घरात वीजपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे झाले आहे, यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा होतो खंडित ः सांगळे
उपकेंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच पावसाळा पूर्वी होत सुरु असलेल्या दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडीत होत आहे. असे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले.