मुंबई – मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली की अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येते. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पुन्हा तुंबलेली दिसून येते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूर स्थितीवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले आहे.
यातच वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात त्यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी सूचना गडकरींनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. पारंपारिक पद्धतीनं बनवण्यात येणारे रस्ते अतिपाऊस आणि पुराच्या काळात खराब होतात. त्यामुळे मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात यावे, यासाठी त्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचं उदाहरण दिलं आहे. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात यावा, असा सल्ला नितीन गडकरींनी ठाकरे आणि पवारांना दिला.
ते पुढे म्हणाले, मुंबई तुंबल्यामुळे रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. पूर येऊन गेल्यानंतर शासनाला स्वच्छता, आरोग्य सेवां पुरवणे अशी कामं करावी लागतात. या काळात मालमत्तांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्या दुरुस्तीकडं लक्ष देता येत नाही, मात्र, रस्ते तातडीनं दुरुस्त करावे लागतात, असे गडकरींनी निदर्शनास दिले.