मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. “हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सरकारला केला आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
“कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही.”, असं प्रत्युत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आशिष शेलारांना दिले आहे.
“आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केलं जातं. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे.”, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
“यामध्ये अपयश आहे असं मी म्हणणार नाही. यातले फार बारकावे मला सांगता येणार नाहीत. त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. एटीएसचं या घटनेवर लक्ष आहे. पोलिसांना पोलिसांच्या् पद्धतीने तपास करू दिला पाहीजे. त्यातून सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल.:, असेही त्यांनी पुढे सांगितले.