मुंबई – कंगना राणावतच्या मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता कंगनावर टीका केली आहे. हा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अपमान आहे. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.
संजय राऊतांनी धमकी दिल्याचा आरोपही कंगनाने केला होता. यावर राऊत म्हणाले कि, मी कोणाचेही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तसेच मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालत आहेत त्या राजकीय पक्षांना मुंबई, महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकार नाही. ही लोकं जी निवडून आली आहेत त्यांना काय पाकड्यांनी मतदान केलं आहे का ? याचा खुलासा त्या पक्षाकडून होणं गरजेचं आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणताना लाज वाटली पाहिजे. मुंबईचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला येथे राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही. कंगनाला झाशीची राणी म्हणणे हा झाशीच्या राणीचा सगळ्यात मोठा अपमान आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी भाजपाचे नाव न घेता टीका केली.