नगर -तिघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाचे काही चालत नाही. त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात जनतेला सांगितले आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार फुटतील या भीतीने ते सत्तेमध्ये आहेत. कॉंग्रेस पक्षाची व्यथा खूप वाईट असून, कॉंग्रेसला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे, असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवलाचे चेक वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. समवेत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत म्हस्के, भीमराज लांडगे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, हरिभाऊ कर्डिले, संभाजी पवार, छत्रपती बोरुडे, अनिल ठोंबरे, बन्सी कराळे, उद्धव कांबळे, तुकाराम वाघुले, शाम घोलप, बाजारीव हजारे, मनोज कोकाटे, प्रशांत गहिले, राजेंद्र कोकाटे, महेश पाटील, पोपट शेळके, भाऊसाहेब काळे, राजेंद्र आरोळे, संतोष ढगे, अनिल शेडाळे, विजय काळे, बाबा काळे, रमेश गव्हाणे, कचरू ढगे, काशिनाथ गावडे, गंगाधर काळे, ऍड. अर्जुन पवार, बाबाजी शेख आदी उपस्थित होते.
संपत म्हस्के म्हणाले की, अडचणीच्या काळामध्ये शिवाजी कर्डिले शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना भरीव मदत केली. त्यांच्या समवेत जिल्हा बॅंकेत काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारख्या सर्वसामान्याला बॅंकेचे उपाध्यक्षपद मिळाले, त्यात कर्डिले यांचे मोलाचे सहकार्य राहिले. आम्ही नाबार्डच्या माध्यमातून गाई म्हशीसाठी शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयांचे कर्ज दिले. आज करोनाच्या काळात शेतकरी संकटात आला आहे. अशावेळी कर्डिले शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले. नगर तालुक्याला कर्डिले यांनी कायम सांभाळले.