भारतात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हिंजवडी आयटी पार्कचे नाव अग्रगण्य आहे. आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांमुळे पुण्याचे नाव जगात पोहचले आहे. इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टेक महिंद्रा अशा अनेक कंपन्यांनी हिंजवडीत आपली विकास केंद्रे विकसित केली आहेत. हिंजवडी येथील 684 हेक्टर परिसरात तीन फेजमध्ये आयटी पार्क स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातून होणारी सॉफ्टवेअर क्षेत्रापैकी 60 टक्के निर्यात ही याच आयटी पार्कमधून होते. त्यामुळे महाराष्ट्राचे भूषण अशी या आयटी पार्कची ओळख झाली आहे.
कंपन्यांच्या मदतीसाठी हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनची स्थापना झाली. या असोसिएशनच्या माध्यमातून कंपन्यांना पाठिंबा देण्यात येतो. तसेच कंपन्यांना प्रशासकीय मदत केली जाते. आयटी कंपन्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, विविध विभागांतील सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याबरोबरच या परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतुकीमध्ये सुधारणा करण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून केले जात आहे. येथील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. या समस्या सोडविण्यासाठी कामाचे नियोजन करावे लागणार आहे. या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास झाला तर आयटी पार्कला भविष्यात चांगले दिवस येतील. त्यासोबतच उत्पन्नात भर पडून राज्याच्या विकासास हातभार लागेल.
पायाभूत सुविधांची वानवा
रस्ता आणि पायाभूत सुविधांचा विषय गंभीर आहे. आयटी पार्कमध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून रोज दोन ते तीन लाख लोकांची ये-जा होते. या परिसरातील पर्यायी रस्ते सक्षम नसल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पीएमआरडीएने बालेवाडी ते आयटी पार्कपर्यंतचा रस्ता करण्याचे नियोजन केले असले तरी हा रस्ता अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. दोन वर्षांपूर्वी 70 टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, पीएमआरडीएकडून जमिनीचे हस्तांतर एमआयडीसीकडे होत नाही, तोपर्यंत येथील वाहतुकीचा प्रश्न सुटणे कठीण आहे.
हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनची मोलाची मदत
आयटी पार्कचा संपूर्ण परिसर एमआयडीसीमध्ये येतो. एमआयडीसीकडून परिसराची स्वच्छता केली जात असली तरी पूर्ण होत नाही. त्यामुळे असोसिएशनने हा भाग स्वच्छ ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी यामुळे कंपन्यांच्या तोट्यात भर पडते. कंपन्यांना 20 ते 25 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आयटी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, म्हणून असोसिएशनच्या माध्यमातून आयटी पार्कच्या सुरक्षेसाठी गस्त घालणे, बसची सुविधा देणे असे उपक्रम राबवले जात आहेत.