पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 19 जानेवारी रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार असून यासाठी 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांना प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षात “टीईटी’च झाली नव्हती. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 तर, पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 याप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश पत्राबरोबरच ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिर्वाय आहे. ई-आधारही चालणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात 1 हजार 44 केंद्रांची व्यवस्था
राज्यात या परीक्षेसाठी एकूण 1 हजार 44 केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. पेपर क्रमांक 1 साठी 572 तर, पेपर क्रमांक 2 साठी 472 केंद्र असणार आहेत. परीक्षेसाठी 26 हजार 67 कर्मचारी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विशेष भरारी पथकही नेमले असून यात जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, निरंतरचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे.