हिंजवडी (वार्ताहर) – हिंजवडी ग्रामपंचायतीने सुमारे तीन कोटींच्या निधीतून प्रशस्त भाजीमंडई उभारली आहे. परंतु फळ व भाजीविक्रेते शिवाजी चौकातील एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावरच आपली दुकाने थाटून बसत असल्याने आयटीनगरीत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रस्त्यात बसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण? असा प्रश्न हिंजवडीकरांसह आयटीयन्स व प्रवाशांना पडला आहे.
मागील काळात ग्रामपंचायतीने काही विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. परंतु काही महिन्यातच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च पाहायला मिळत आहे. एकमेकांकडे बोटे दाखवून टोलवाटोलवी करणारे ग्रामपंचायत, एमआयडीसी व पोलीस प्रशासन सध्या मूग गिळून गप्प असल्याने हिंजवडी एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर भरणारा आठवडे बाजार सर्वांसाठी डोकेदुखी बनला आहे.
काही महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा रस्त्यावर हा बाजार सुरू झाला असल्याने पथारीवाल्यांचा हा मुजोरपणा प्रशासनासह स्थानिक प्रवासी, नागरिक व ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर (रविवारी) पुन्हा बाजार भरू लागल्याने मुख्य रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होत आहे. त्यातच मेट्रोच्या कामासाठी बॅरिगेट्स लावल्याने आधीच हिंजवडीतील रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच आठवडे बाजाराची आणखी भर पडत असल्याने रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
बाजारामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहने जात परिणामी मेझा 9 हॉटेल ते शिवाजी चौकापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणार्या चाकरमान्यांना रविवारी देखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मात्र हे सर्व पाहूनही वाहतूक पोलीस वाहतुकीला अडथळा ठरणार्यावर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत विरुद्ध दिशेने येणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात मग्न असतात.
हिंजवडी ग्रामपंचायतीने तीन कोटींहून अधिक रुपये खर्च करून भव्य अत्याधुनिक भाजी मंडई उभारली आहे. त्यातील काही गाळे लिलावपद्धतीने भाडेतत्वावर दिले आहेत. मात्र, ते गाळेही धूळ खात पडले असून व्यावसायिक मुख्य रस्त्यांवर आपली दुकाने व हातगाड्या उभ्या करून रस्ता अडवतात. परिणामी रविवारी हा रस्ता वाहतुकीसाठी एका बाजूने बंदच होतो.
भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करत असल्याने वाहतुककोंडीत अधिकची भर पडते. मात्र हा सर्व प्रकार पाहूनही हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस, स्थानिक पोलीस तसेच ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
कारवाईत सातत्य नसल्याने विक्रेते पुन्हा रस्त्यावर
गेल्या कित्येक वर्षांपासून रहदारीच्या रस्त्यावर भरणारा आठवडे बाजार पोलिसांच्या दंडात्मक कारवाईमुळे मागील एक वर्षापासून बंद झाला होता. मात्र, अलीकडे ग्रामपंचायत व पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नसल्याने विक्रेते पुन्हा रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांवर कारवाई करणार कोण असा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.